लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुसरे समन्स पाठवले आहे. पाटील यांना २२ मे रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना समन्स बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जयंत पाटील राज्याचे माजी गृह आणि माजी अर्थमंत्री आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सातवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांना शुक्रवारी सकाळी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने बोलावले होते. पण त्यांनी या समन्सबाबत ईडीला पत्र लिहून वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ईडीने जयंत पाटील यांना आठवड्याभराची मुदत दिली आहे. पाटील यांना ईडीने दुसरे समन्स बजावले असून त्यात २२ मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आयएल अॅण्ड एफएसने दिलेल्या संशयास्पद कर्जप्रकरणी पाटील यांची ईडी चौकशी करणार आहे.
आणखी वाचा- मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याचा आरोप आहे. ईडीने याप्रकरणी आयएल अॅण्ड एफएसचे दोन माजी लेखापाल व त्यांचे सहाय्यक यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर गेल्या आठवड्यात शोध मोहिम राबवली होती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरूवात केली होती. यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही ईडीने या प्रकरणी चौकशी केली होती. २००५ मध्ये ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी कोहिनूर मिल क्र. ३ आणि कोहिनूर सीटीएनएलची स्थापना केली. ठाकरे तीन वर्षांतच या प्रकल्पातून बाहेर पडले होते.
आयएल अॅण्ड एफएस यांनी विविध कंपन्या व संस्थांना दिलेल्या कर्जांबाबत ईडीला संशय आहे. त्याबाबत आता तपास सुरू आहेत. आयएल अॅण्ड एफएस या कंपनीने २०१८ मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता.