मुंबई : मुंबई आणि परिसरात मंगळवारी हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, पावसाने तो पुन्हा एकदा चुकीचा ठरवला आहे. मंगळवारी पावसाने उघडीप दिली. दरम्यान, बुधवारपासून शहर आणि उपनगरांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यातील अनेक भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. परिणामी मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबई तसेच इतर भागात पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर हवामान विभागाने मंगळवारी मुंबईसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र, प्रत्यक्षात शहर आणि उपनगरात मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली. काही ठिकाणी पहाटे हलक्या सरी बरसल्या त्यानंतर संपूर्ण दिवस कोरडा होता.

हेही वाचा >>> …तरच आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ; पीएफआयच्या दोन सदस्यांना जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

हवामान विभागाच्या कुलाबा केद्रांत मंगळवारी ०.८ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात १.५ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारपासून पुढील दोन ते तीन दिवस शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तसेच या कालावधीत सायंकाळी किंवा रात्री तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २९ आणि २५ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दरम्यान, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कायम आहे. तसेच कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे. मोसमी पावसाचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे आणि गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे राज्यातील काही भागात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव परिसरात हलका पाऊस, तर, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावासाचा अंदाज कायम आहे.