लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत मुंबईकरांनी मंगळवारी गणेशाला निरोप दिला. लालबागमधून मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास निघालेली लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक बुधवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचली आणि बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास लालबागच्या राजाचे विसर्जन झाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुमारे ३७ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले.

गणेशोत्सवाच्या अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला ठिकठिकाणांहून विसर्जनस्थळाच्या दिशेने गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. ढोल-ताशाचा गजर, फटाक्यांची आतशबाजी आणि गणेश नामाचा जप करीत भाविक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. रखरखत्या उन्हातही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. गणरायांच्या दर्शनासाठी गिरगाव, लालबाग – परळ, दादर आदी विविध परिसर गर्दीने फुलून गेले. बहुसंख्य नागरिक गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गिरगाव, दादर, जहू चौपाटीवर दाखल झाले होते.

आणखी वाचा-Eknath Shinde : आजोबांसाठी नातू म्हणजे दुधावरची साय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या नातवाला खांद्यावर घेत केली गणपतीची आरती

समुद्राला मंगळवारी रात्री भरती येणार असल्याने अनेक मंडळांनी तत्पूर्वीच गणेश विसर्जन केले. तर, अनेक मंडळांच्या मिरवणुकांचा जल्लोष बुधवारी पहाटेपर्यंत सुरू राहिला. मुंबईचा राजा, मुंबईचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, ताडदेवचा राजा, खेतवाडीचा राजा, परळचा महाराजा, खेतवडीचा विघ्नहर्ता, गिरगावचा राजा, गिरगावचा महाराजा, मंगलदासचा राजा भक्तांसह मोठ्या दिमाखात गिरगाव चौपाटीवर दाखल झाले. गणरायाच्या नामघोषात संपूर्ण मुंबई बुधवारी पहाटेपर्यंत दुमदुमत होती. या उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलिसांनी उत्तम समन्वय साधत महत्त्वाची कामगिरी बजावली.

महापालिकेने यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविली होती. संपूर्ण मुंबईत ६९ नैसर्गिक स्थळांसह अजून २०४ कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था उपलब्ध केली आहे. मंगळवारपासून बुधवारी पहाटेपर्यंत मुंबई व दोन्ही उपनगरात मिळून एकूण ३७०६४ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात ५७६२ सार्वजानिक तर, ३११०५ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश होता. तसेच, १९७ गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात ७०९ सार्वजानिक, १०९५७ घरगुती आणि ४७ गौरी असे एकूण ११७१३ मूर्तींचे विसर्जन पार पडले.

आणखी वाचा-Sameer Khan : नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात गंभीर जखमी, समीर खान आणि निलोफर यांच्या थारचा मुंबईत अपघात

महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या सोयी सुविधा

गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिका प्रशासनातर्फे दरवर्षी विविध योजना व सुविधा उपलब्ध करण्यात येतात. यंदाही गणेशोत्सव जल्लोषात आणि कुठल्याही अनुचित न घडता पार पडावा, यासाठी पालिकेतर्फे अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच कृत्रिम तलावांची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करण्यात आली होती. पालिकेतर्फे गणेशमूर्ती विसर्जनासाठी १५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ७१ नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला होता. समन्वय साधण्यासाठी एकूण १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले होते. तसेच, चौपाट्यांवर सुरक्षेसाठी ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी तैनात होते. निर्माल्य संकलित करण्यासाठी १६३ निर्माल्य कलश आणि २७४ निर्माल्य वाहनांची सोय उपलब्ध करण्यात आली होती. दरम्यान, फिरत्या शौचालयांचीही सोय करण्यात आली आहे. चौपाटींच्या किनाऱ्यांवर ४७८ स्टील प्लेट आणि छोट्या मूर्तींच्या विसर्जनासाठी ४३ जर्मन तराफे सज्ज होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immersion of lalbaghcha raja on wednesday around 10 30 am mumbai print news mrj