मुंबई : गारगाई धरणाच्या बांधकामामुळे सह्याद्रीचा वायव्य भाग आणि पालघर जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांच्या मुक्तसंचारावर मर्यादा येतील. तसेच तेथील परिसंस्थेस हानी पोहोचेल. त्यामुळे या भागात कुठलेही बांधकाम करण्यास बॉम्बे नॅचलर हिस्ट्री सोसाटीने (बीएनएचएस) आक्षेप घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाला याबाबत पत्र पाठवून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने विरोध दर्शविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गारगाई धरणाच्या बांधकामामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ८३९.०२ हेक्टर जंगल क्षेत्र पाण्याखाली जाणार आहे. तानसा अभयारण्य सह्याद्रीचा अविभाज्य घटक असून जगातील आठ जैवविविधता स्थळांमध्ये सह्याद्रीचा समावेश आहे. येथे धरणाचे बांधकाम केल्यास सह्याद्रीचा वायव्य भाग आणि पालघर जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्य येथील वन्यजीवांच्या मुक्तसंचारावर मर्यादा येतील, त्यामुळे गारगाई धरण बांधू नये, असे बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी केंद्रीय पर्यावरण , वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय आणि राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा : बालमृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश!

बीएनएचएसने २०१५-१६ मध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने प्रकल्प स्थळाचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. यावेळी गवत, जडी-बुटी, वनस्पती, झुडूपे, वेल, बुरशी यात अधिवास करणारे पाठीचा कणा असणारे आणि नसणारे प्राणी आणि जिवजंतू यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान गारगाई धरणाचे बांधकाम केले, तर सुमारे ४ लाख झाडे पाण्याखाली जातील. नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आलेले भारतीय घुबडही या भागात आढळते. या प्रकल्पामुळे या अभ्यारण्यातील सजीव व सूक्ष्मजीवांसह संपूर्ण परिसंस्थेला बाधा होण्याची शक्यता आहे. याचे दूरोगामी परिणाम भोगावे लागतील. या अभयारण्यात २१२ प्रकारचे पक्षी आढळून येतात. त्यांचे अधिवासही संकटात येऊ शकतो, असेही या पत्रात म्हटले आहे. बीएनएचएसच्या अहवालात भारतीय घुबडासह विशिष्ट पक्षी, किडे, सस्तन प्राणी आदींची माहिती गोळा करण्यात आली आहे.

बिबटा, पिसूरी हरिण, सांबर, बिबट्यासारखी दिसणारी मांजर, ठिपक्यांची मांजर, भारतीय साळिंदर, लालसर रंगाचे मुंगुस, लहान आकाराचा भारतीय कांडेचोर, पट्टेदार तरस, भारतीय खवल्या मांजर आदी सस्तन प्राण्यांचे ५० पेक्षा जास्त प्रकार या अभयारण्यात आहेत. चार शिंगांचे काळवीट या परिसरात आढळते. त्यामुळे तानसाला अभयारण्य जाहीर करण्याची शिफारस करण्यात आली होती. या भागात १९८० पर्यंत वाघ दिसत होते, असे भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने १९९२ मध्ये केलेल्या अभ्यासात आढळले होते.

हेही वाचा : निवासी डॉक्टर राज्यव्यापी संपावर ठाम, गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून जाणार संपावर

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तानसा आणि इतर अभयारण्यांमध्ये बांधण्यात आलेल्या धरणांमुळे हजारो एकर जैवविविधता असलेला जंगलाचा भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पाण्याची गळती आणि दुरुपयोग रोखणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी पाण्याचा पूर्नवापर करणे, समुद्राच्या पाण्याचा विलवणीकरण प्रकल्प, पावसाच्या पाण्याची योग्य साठवणूक यावर मोठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यातून पाणी बचत होऊन अभयारण्यातील जैवविविधताही टिकवात येईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : तंबूतून टॉवरपर्यंत! यशस्वी जैस्वालची गगनभरारी; मुंबईत घेतलं ५ कोटींचं घर!

“या प्रकल्पाच्या तानसा अभयारण्यावरील दुष्परिणामांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला कळविण्यात आले आहे .प्रस्तावित प्रकल्पामुळे ८३९ हेक्टर वनक्षेत्र लोप पावेल. तसेच येथे रान पिंगळा या दुर्मिळ पक्ष्याचा अधिवास आहे. या प्रकल्पामुळे जैवविविधता धोक्यात येऊ शकते.” – किशोर रिठे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai bombay natural history society biodiversity under threat due to gargai dam mumbai print news css
Show comments