मुंबई: घाटकोपरमधील नारायण नगर परिसरात असलेल्या एका प्लस्टिकच्या कारखान्याला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात कच्चा माल जळून खाक झाला असून आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.

नारायण नगर परिसरातील या कारखान्याला बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वेष्टनाची निर्मिती करण्यात येते. त्यामुळे कारखान्यात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात साठा होता. परिणामी काही क्षणातच आगीचा भडका उडाला. आग लागताच कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर धाव घेतली आणि आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने श्रेणी २ ची वर्दी दिली होती. मात्र प्लास्टिकच्या साठ्याने पेट घेताच आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले. त्यामुळे आगीच्या ज्वाळांनी रौद्र रुप धारण केले. तसेच आगीमुळे परिसरात दुराचे साम्राज्य पसरले. अग्निशमन दलाने आगीची तीव्रता लक्षात घेऊन सायंकाळी ६.२९ च्या सुमारास श्रेणी ३ ची वर्दी दिली.

हेही वाचा : ज्येष्ठ लेखक भा. ल. महाबळ यांचे निधन

या कारखान्याच्या बाजूलाच मोठी झोपडपट्टी असून एक खासगी शाळाही आहे. मात्र सुदैवाने तेथे कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. अग्निशमन दलाचे जवानांनी रात्री ९ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.