मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) प्रकल्पस्थळी वा प्रकल्पस्थळाच्या आसपासच्या परिसरात पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद््भवू नये यासाठी एमएमआरडीएने सर्व कंत्राटदारांना पावसाळ्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडली वा पाणी साचणे, झाड कोसळणे यासारख्या घटना घडल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी एमएमआरडीएने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी नियंत्रण कक्ष सज्ज केला आहे. शनिवार, १ जूनपासून हा कक्ष कार्यान्वित होणार आहे.

मेट्रो रेल प्रकल्प, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार, ऐरोली-काटाई नाका बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्प, शिवडी-वरळी कनेक्टर, छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासह अन्य काही प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पस्थळी पावसाळ्यात पाणी साचणे, झाड कोसळणे, वाहतूक कोंडी होणे वा इतर कोणतीही समस्या निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. १ जून ते १५ ऑक्टोबरदरम्यान हा कक्ष कार्यान्वित असणार आहे. नागरिकांना दूरध्वनी क्रमांक ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६, मोबाइल क्रमांक ८६५७४०२०९० आणि मदत वाहिनी क्रमांक १८००२२८८०१ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कक्ष २४ तास कार्यान्वित असणार आहे.

हेही वाचा : मुंबई: ‘अभियांत्रिकी’ सत्र ८ आणि ‘बीएमएस’ सत्र २ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

एमएमआरडीएचे सुमारे ३०० जणांचे पथक सज्ज

पावसाळ्यात उद्भवणार्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आवश्यक ती मदत मिळावी यासाठी एमएमआरडीएकडून ३०० जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक मेट्रो प्रकल्पासाठी या पथकाद्वारे अधिकार्यांची नियुक्त करत त्यांच्यावर निश्चित अशी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक मेट्रो प्रकल्प स्थळी १ अभियंता आणि १० मजुरांची टीम (आपत्कालीन दल )तैनात असणार आहे. विविध मेट्रो प्रकल्पस्थळी अशा एकूण १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात करण्यात आले आहेत. प्रकल्पस्थळी रात्रीच्या वेळी एमएमआरडीए/ सल्लागार/कंत्राटदारांकडून वेळोवेळी तपासणी करण्याचे नियोजित केले आहे. त्यासोबतच एकूण १८ आपत्कालिन केंद्र, १८ देखभाल वाहने आणि १७ ॲम्ब्युलन्सची तरतूद करण्यात आली असून ही सुविधा २४ तास उपलब्ध असणार आहे. प्रकल्पलगतच्या भागात पाण्याचा निचरा योग्य रितीने करण्यासाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या क्षमतेचे सुमारे १३१ पाणी उपसा करणारे पंप उपलब्ध करण्यात आले आहेत. तर इतरही उपाययोजना करत मेट्रोच्या प्रकल्पस्थळी कोणत्याही समस्या पावसाळ्यात निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : जीर्ण इमारती, दरडप्रवण क्षेत्रांची पाहणी; आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयाने वांद्रे, अंधेरी, व मालाडमध्ये पाहणी

अटल सेतूसाठीही विशेष पथक

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू काही महिन्यांपूर्वीच वाहतूक सेवेत दाखल झाल आहे. तेव्हा यावेळी अटल सेतूसाठीही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पथक तयार करण्यात आले आहे. यात एका अभियंत्यासह १० मजुरांचा समावेश आहे. सागरी सेतूवर कोणत्याही प्रकारची समस्या पावसाळ्यात निर्माण झाली तर प्रवाशांना-नागरिकांना १८००२०३१८१८ या क्रमांकावर संपर्क साधत आपली तक्रार नोंदविता येणार असून आवश्यक ती मदत मिळविता येणार आहे. दरम्यान एमएमआरडीएच्या महत्त्वाकांक्षी अशा सुर्या प्रकल्पात बुधवारी रात्री दुर्घटना घडली आहे. कामादरम्यान भुस्खलन झाले आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पात यापुढे कोणतीही दुर्घटना घडू नये तसेच घटना घडली तर तात्काळ मदत मिळावी यासाठीही पथक नेमण्यात आले आहे. या प्रकल्पातील जलवाहिनी व उपकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी कंत्राटदारामार्फत गस्त पथकाची स्थापना करण्यात आली आहे.