मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये युट्युबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल प्रकरणी युट्यूबर समय रैनाला पुन्हा समन्स बजावले आहे. त्याला १९ मार्चला चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे. ट्युबर समय रैना परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी केली होती. पण ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली आहे. त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

महाराष्ट्र सायबर विभागाने यूट्यूबर समय रैनाला समन्स बजावले होते. त्यानुसार त्याला १७ मार्चला चौकशीसाठी बोलावले होते. पण तो अनुपस्थित राहिला. रैना परदेशात असल्यामुळे त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवण्याची विनंती केली. सध्या तो देशाबाहेर असल्यामुळे त्याने ही विनंती केली. मात्र, महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांना मागणी फेटाळली आणि त्याला वैयक्तिकरित्या उपस्थित राहून जबाब नोंदवावा लागेल, असे सांगितले. त्यांच्या जबाबासाठी त्याला १९ मार्चला कफ परेड येथील महाराष्ट्र सायबर विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. तो सध्या अमेरिकेमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

३०, ४० जणांविरोधात गुन्हा

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या नुकत्याच झालेल्या एका भागात अलाहबादियाने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यात तो परीक्षक म्हणून उपस्थित होता. त्याच्यासोबत इतर लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स अशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखीजाही होते.अलाहबादियाने एका स्पर्धकाशी संभाषण करताना वादग्रस्त विधान केले. या वक्तव्यामुळे त्याच्यावर समाज माध्यमांवर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने रैना, रणवीर सह ३० ते ४० जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. रणवीरच्या उपस्थितीत झालेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा सहभागाची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, समय रैनाने एक्सवर पोस्ट करत यूट्यूबवरील सर्व चित्रफीती हटवल्याचा दावा केला होता.

मुंबई पोलिसांकडूनही चौकशी याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागासह गुवाहाटी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय याप्रकरणी मुंबई पोलिसांनाही तक्रार प्राप्त झाली असून त्याप्रकरणी मुंबई पोलीसही प्राथमिक चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनीही याप्रकरणी रणवीर व समय यांच्यासह सहा जणांना चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. तसेच महाराष्ट्र सायबर विभागानेही याप्रकरणी सुमारे ५० जणांना समन्स बजावले आहेत. त्यात कार्यक्रमांच्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी परीक्षक, स्पर्धकांचा समावेश आहे.