मुंबई : भारतात सोन्याला प्रचंड मागणी असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सोन्याच्या तस्करीसाठी नवनवीन क्लृप्त्या लढविण्यात येत आहेत. तसेच देशांतर्गत विमानतळांचा त्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान, कन्नड अभिनेत्री रान्या रावला बंगळुरूमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी अटक केली असून आता सोन्याच्या तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिणामी, सर्वच यंत्रणांनी सोने तस्करीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) २०२३-२४ मध्ये एक हजार ३१९ किलो सोने जप्त केले. सोने तस्करीसाठी २०२३ पासून म्यानमारचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. गेल्या काही वर्षांत तस्करीतील ३७ टक्के सोने म्यानमार मार्गे आले भारतात होते. मात्र भारतात होणाऱ्या सोने तस्करीचे केंद्र दुबई आहे. वर्षानुवर्षे भारतात दुबईतूनच सोन्याची तस्करी होत आहे. पण आता तस्करीच्या मार्गांमध्ये बदल होत आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यामध्ये भारतासह विविध देशांतील टोळ्यांचा सहभाग आहे. दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियातून सोने दुबईला आयात केले जाते. हे सोने छुप्या पद्धतीने विविध देशांतून भारतात पाठवले जात आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील टोळ्या दुबईतील आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग बनून कोट्यावधींचा नफा कमवला. महसूल गुप्तचर संचालनालयाने २०२१-२२ मध्ये जप्त केलेल्या सोन्यापैकी ३७ टक्के म्यानमारमधून, तर २० टक्के आखाती देशांतून, सात टक्के बांगला देशातून, तर ३६ टक्के इतर देशांतून भारतात सोन्याची तस्करी करण्यात आली होती, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
विशेष करून भारतात सोन्याला मोठी मागणी आहे. सोने आयात करण्याचेही पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारने दिलेल्या परवान्याची आवश्यकता असते. आयात केलेल्या सोन्यावर सीमाशुल्क आणि इतर शुल्कासह सुमारे २५ टक्के रक्कम भरावी लागते. तसेच आयात करण्यासाठी काळ्या पैशांचा वापर केल्यास अटक होऊ शकते. पण तस्करी मार्गे सोने भारतात आणले, तर एका किलोमागे लाखो रुपये फायदा होता. तसेच काळ्या पैशांचा वापर तस्करीत करून चलनात आणता येऊ शकतो. त्यामुळे आयातीचा पर्याय उपलब्ध असतानाही सोन्याची तस्करी केली जाते.
विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांचे प्रोफाइलिंग, बॅगांची काटेकोरपण तपासणी, श्वान पथके, गुप्त माहिती, तसेच आखाती देश व इतर संवेदनशील ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांच्या विशेष तपासणीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सीमाशुल्क विभाग व डीआरआय या यंत्रणा सोने तस्करी रोखण्यासाठी सक्रीय आहेत. याशिवाय विमानतळावर केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना तस्करी रोखण्यासाठी बॅगा तपासणीचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.
म्यानमानवरूनच तस्करी का ?
म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरमधील तमू-मोरेह-इंफाळ हा मार्ग आणि मिझोराममधील जोखटवार मार्गे देशात सर्वाधिक सोन्याची तस्करी होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे म्यानमारहून भारतात सोन्याची तस्करी करणे तुलनेने सोपे आहे. भारतातून म्यानमारच्या पाच किलोमीटर आत जाण्यासाठी कोणतेही बंधन नाही. फक्त ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ते दाखवून कोणालाही म्यानमारमध्ये जाता येते. तिथून विविध वस्तूंची खरेदी करून नागरिक परत येतात. सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्या याचा फायदा घेतात. एक तर म्यानमारमधील तस्कर भारतात सोने पुरवतात किंवा इथल्या टोळ्या म्यानमारमधून सोने आणतात. विमानतळ व बंदरांच्या तुलनेत म्यानमार सीमेवर कमी तपासणी होते. तस्कर त्याचाच फायदा घेत होते. पण गेल्या काही वर्षांपासून म्यानमार येथेही मोठ्या प्रमाणात कारवाई होऊ लागल्यामुळे तस्करांनी आता नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अशी होते सोन्याची तस्करी
मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणांची नजर आहे. त्यामुळे तस्कर आंतरराष्ट्रीय विमानतळाऐवजी देशांतर्गत (डोमॅस्टिक) विमानतळावरून सोने बाहेर काढत आहेत. त्यातूनच भींतीवरून सोन्याची पाकिटे फेकणे, काचेच्या दोन पार्टिशनमध्ये सोन्याच्या भुकटीची पाकीटे फेकण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्यावर्षी अशा कार्यपद्धतीचा अवलंब करून तस्करी करणाऱ्या किमान १० हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती.
सोने तस्करीचे व्यवहार असे होतात
तस्करीचे सोने भारतात विकण्यासाठी हवाला व्यवसायाप्रमाणे एक ते १० रुपयांच्या नोटांचा वापर केला जात होता. या नोटांचा टोकन म्हणून वापर केला जात होता. डीआरआयने १४७३ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी रईस अहमद अक्केरी याला अटक केली. त्याच्या चौकशीत ही बाब उघड झाली. विश्वासू सराफाबरोबर दूरध्वनीवरून व्यवहार निश्चित करण्यात येत होता. त्यावेळी एक ते दहा रुपयांच्या नोटांचा क्रमांक संबंधित सराफाला देण्यात येत होता. विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला हा टोकन क्रमांक सांगितल्यानंतर त्याला सोने देण्यात येत होते. अन्यथा व्यवहार होत नव्हता. झवेरी बाजारमधील एका सराफाला १०० किलो सोने आरोपींनी विकले होते. ते म्यानमारमार्गे भारतात पोहोचले होते.
चॉकलेटच्या आत सोने
सोने तस्करीसाठी तस्कर विविध क्लृप्त्या लढवत आहेत. चॉकलेटचा थर चढवलेले सोने वेष्टनात दडवून तस्करी केली जाते. याशिवाय गृहउपयोगी वस्तू, लॅपटॉप, हेअर ड्रायरसारख्या वस्तूंमध्ये सोने लपवूनही त्याची तस्करी केली जाते. सध्या शरीरात, अंतर्वस्त्रांमध्ये लपवूनही सोन्याची तस्करी केली जाते. सोन्याची भुकटी कॅप्सूलमध्ये लपवून ती गिळूनही तस्करी केली जाते. अशा तस्करांना केळी वा पाणी दिले जाते. याशिवाय सोन्याची भुकटी करून मेणामध्येही लपवून त्याची तस्करी केली जाते, असे अधिकाऱ्याने सांगितले.