मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये २०१९ पासून २०२४ पर्यंत १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. केईएममध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात गर्भवती महिला प्रसूतीसाठी येत असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात नवजात अर्भकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करुन पुढील मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजले जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये मुंबईसह आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी येत असतात. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाणही अधिक आहे. मात्र केईएम रुग्णालयामध्ये २०१९ ते २०२४ या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये नवजात शिशु विभागामध्ये १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये २२५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला असून, २०२० मध्ये २०६, २०२१ मध्ये १७९, २०२२ मध्ये १८८, २०२३ मध्ये १७९ व २०२४ मध्ये १९९ अशा एकूण १ हजार १७६ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. नवजात अर्भकांचा मृत्यू होण्यामागील प्रमुख कारणांमध्ये मातेचे वजन कमी असणे, प्रसूतीपूर्वी झालेला संसर्ग, प्रसूतीदरम्यान झालेली गुंतागुंत, बाळाला प्राणवायूचा पुरवठा पुरेसा न होणे अशी महत्त्वाची कारणे असल्याचे प्रसूतीतज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

मात्र केईएम रुग्णालयामध्ये सहा वर्षांमध्ये १ हजार १७६ बालकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब असल्याचा मुद्दा आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये होणाऱ्या नवजात बालकांच्या मृत्यूबाबत रुग्णालय स्तरावर चौकशी करण्यात येत आहे. तसेच नवजात अर्भकांचा मृत्यू टाळण्यासाठी योग्य ते प्रतिबंधक उपाय योजण्यात येत आहेत. तसेच, गरोदर महिलांच्या सर्वंकष आरोग्याच्या दृष्टीने योग्य समयी नाव नोंदणी करणे, त्यांना औषधोपचार व आहार पुरविणे, त्यांचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे सांगितले.

नवजात अर्भकाचा मृत्यू म्हणजे काय ?

जेव्हा बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या चार आठवड्यांत (२८ दिवस) मृत्यू होतो, त्याला नवजात अर्भकाचा मृत्यू असेही म्हणतात. बहुतेक नवजात बालकांचा मृत्यू जन्मानंतर पहिल्या आठवड्यात होतो.

Story img Loader