कपिल सिब्बल यांचे केंद्रावर टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने इंडिया गेटवर कार्यक्रम करून करोडो रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत द्यायला हवी होती, असे प्रतिपादन करीत ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली.
काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत सिब्बल यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेवर आल्यावर जनतेसाठी काहीच केले नाही. महागाई कमी करू सांगितले, पण तूरडाळीचे दर २०० रुपये किलोवर गेले. जीएसटीला आधी विरोध केला असताना आता तो लागू करण्याची धडपड केंद्र सरकार करीत आहे. ‘निर्मल भारत’ योजनेचे नाव बदलून ‘स्वच्छ भारत’ केले, पण ती योजना राबविण्यात सरकारला अपयश आले आहे. रोजगारनिर्मिती वाढविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. निर्यात घटली आहे. अबकारी करांमध्ये वाढ केली असून उद्योजक, व्यापारी, शेतकरी अशा सर्व स्तरांतील जनता नाराज आहे.
* नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने ६९६ जागा लढविल्या व केवळ ६४ जिंकल्या.
* काँग्रेसने ३३५ लढविल्या व ११५ जिंकल्या. आसामचा अपवाद सोडला तर भाजपला कुठेही यश मिळालेले नाही.
* काँग्रेसमुक्त भारत करण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे सिब्बल यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sibal comment on government