मुंबईतल्या दैनंदिन वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी बीकेसी कोविड सेंटरची पाहणी केली. मुंबईत चौपट वेगाने रुग्णवाढ होतं असून घाबरण्यापेक्षा नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहान किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजपाच्या किरीट सोमय्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे.
“घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया. घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे,” असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मुंबईसह राज्यामध्ये दिवसोंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच निर्बंध आणि लॉकडाउनच्या चर्चा सुरु आहेत. यावरून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वसामान्यांमध्ये दाखवली जात असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता.
Omicron: राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या, लॉकडाउनच्या धमक्या; सोमय्यांचा आरोप
काही सत्ताधारी नेते स्वतःच राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने कोरोनाची तिसरी लाट अशी भीती जनतेमध्ये पसरवत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. “काही सत्ताधारी नेते स्वत:चं राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी करोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाउन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे,” असं सोमय्या म्हणाले.
“ओमायक्रॉनच्या ९५ टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची खरी गरजच पडत नाहीय. दोन, तीन दिवसांमध्ये लोक बरी होतायत. खूप कमी लोक ज्यांना सहव्याधींचा त्रास आहे त्यांनी अधिक काळजी घ्यायची गरज आहे,” असंही सोमय्या यांनी म्हटले होते.
दरम्यान, जानेवारीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय वापरासाठीच्या प्राणवायूच्या (ऑक्सिजन) मागणीतही वाढ झाली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात दिवसाला २७० ते ३०० मेट्रीक टन प्राणवायूची गरज लागत होती. मात्र सध्या दिवसाला ४२४ मेट्रीक टन प्राणवायूची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याकडे मुबलक साठा असून प्राणवायूची कमतरता, टंचाई भासणार नाही, पहिल्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही असा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केला आहे.