केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे मुळ चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

हेही वाचा – “एकनाथ शिंदे हे बिनपक्षाचे मुख्यमंत्री, अशा व्यक्तीच्या…”; संजय राऊतांच्या भावाची शिंदे गटासह फडणवीसांवर टीका

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

“मशाल निशाणी ही १९८५ ला शिवसेनेला मिळाली होती. त्यावेळी छगन भुजबळ त्यावर निवडणूक लढले होते. आज २०१२ ला बाळासाहेब गेल्यानंतर जी मशाल स्मृतीस्थळावर लावण्यात आली होती. ती कायम धगधगते आहे. ते चिन्ह आम्हाला मिळाले आहे. आज वाईट पद्धतीने बाळासाहेबांच्या पक्षाला बुडवण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, जेव्हा नियतीचे उत्तर देते, तेव्हा सर्वच शांत होतात. आज निशाणी जी मिळाली आहे. हा नियतीचाच प्रकार आहे”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा – “…तर बाळासाहेबांना काय उत्तर दिलं असतं?”; सुनील राऊतांनी सांगितला न्यायालयातला ‘तो’ प्रसंग

“आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन नावे आणि चिन्हे दिली होती. त्यापैकी मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्हाला निवडणूक आयोगाने दिले आहे. हे नाव आणि चिन्ह तात्पुरते असली, तरी शिवसैनिकांच्या मनाला उभारी देण्याचे काम करणार आहेत. शिवसैनिक निखारा आहे, तो कधीही पेटला असता. मात्र, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाने ते होऊ दिले नाही. त्यामुळे विरोधकांचे राष्ट्रपती राजवट लावण्याचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात जे काम प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. ते काम पुढे नेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत”, असेही त्या म्हणाल्या.