Lawrence Bishnoi Gang Killed Baba Siddique Mumbai Police Demands Custody : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) मुंबईतील प्रमुख नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मुंबईत तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चार आरोपींना अटक केली असून लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बिश्नोई टोळी सातत्याने मुंबईतील रहिवासी असलेल्या कलाकार व पुढाऱ्यांना धमकावत आहे. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर त्याने गोळीबार घडवून आणला होता. त्यामुळे मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करायची आहे. मात्र, मुंबई पोलिसांना त्याची चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी मिळाली नाही. मुंबई पोलिसांनी त्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही.

मुंबई पोलीस लॉरेन्स बिश्नोईची चौकशी का करू शकत नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुंबई क्राइम ब्रँचने आतापर्यंत अनेकदा लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अनेकदा न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, आतापर्यंत एकदाही मुंबई पोलिसांना त्याची कोठडी मिळाली नाही.

मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची कोठडी मिळवण्याच्या मार्गात गृहमंत्रालयाच्या सीआरपीसीच्या कलम २६८ अंतर्गत जारी केलेला आदेश मोठा अडथळा बनला आहे. यामुळे लॉरेन्स बिश्नोईला गुजरातमधील साबरमती तुरुंगातून इतरत्र कोणत्याही ठिकाणी हालवण्याची परवानगी देता येणार नाही. गृहमंत्रालयाचा हा आदेश सुरुवातीला ऑगस्ट २०२४ पर्यंत लागू (प्रभावात) होता. मात्र, इंडिया टूडेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की या आदेशाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई पोलीस सध्या लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील इतर गुंडांच्या मागावर आहेत.

हे ही वाचा >> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट तुरुंगात रचला! रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या आणि.. आत्तापर्यंत काय काय घडलं?

बिश्नोईने पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टीला तुरुंगातून केला होता Video कॉल!

एकीकडे या प्रकरणाचा तपास चालू असताना दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोईचा तुरुंगातला एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लॉरेन्स बिश्नोईनं पाकिस्तानातील गँगस्टर शाहजाद भट्टीला व्हिडीओ कॉल केल्याचं दिसत आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई त्याची गँग तुरुंगातून चालवत असल्याच्या चर्चेला बळ मिळालं आहे.

हे ही वाचा >> बिष्णोई टोळी महाराष्ट्रात कशी पसरते आहे ? महाराष्ट्रात पसरण्यासाठी बिष्णोई टोळीला समाजमाध्यमांचा आधार

१२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर ४८ तासांनी शुबू लोणकर नावाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी लोणकरला अटक केली. अद्याप या पोस्टची विश्वासार्हता तपासण्यात आलेली नाही.