छगन भुजबळ वगळता राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यात अजिबात स्वारस्य नसले तरी पक्षाने आदेश दिल्यास मंत्र्यांना लोकसभेची निवडणूक लढवावीच लागेल, असे फर्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सोडले. पक्षाचा हा आदेश मलाही लागू राहील असेही पवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत संख्याबळ वाढविण्यासाठी पक्षाच्या काही मंत्र्यांना लोकसभेची निवडणूक लढविण्यास सांगण्यात येईल, असे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, रामराजे नाईक-निंबाळकर, गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, गुलाबराव देवकर, फौजिया खान या मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी छगन भुजबळ यांनी पुतण्या समीर खासदार असलेल्या नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. बाकीच्या मंत्र्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही.
जयंत पाटील यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, तर राज्याच्या राजकारणात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याकडे लक्ष वेधण्यात आले असता अजित पवार यांनी, पक्षामुळे गेली १५ वर्षे मंत्रिपद भोगणाऱ्यांना पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवावीच लागेल, असा स्पष्ट इशारा दिला.
शरद पवार निवडणूक लढविणार नसल्यास माढा मतदारसंघातून अजित पवार यांनी रिंगणात उतरावे, असा मतप्रवाह पक्षाच्या मंत्र्यांमध्ये आहे. यावर पक्षाने सांगितल्यास आपल्याला लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल, असे सांगत अजित पवार यांनी अजितदादांना लोकसभेला उभे करावे, असे म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. निवडणूक तयारीकरिता शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी पक्ष नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालांबाबत जनमत चाचण्यांमध्ये राष्ट्रवादीच्या चार ते सहा जागा निवडून येतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.यामुळे विरोधक खुशीत आहेत व त्यातूनच ‘टाळ्या’ थांबल्या असाव्यात, असा टोला पवारांनी शिवसेनेला उद्देशून मारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders have to go dellhi according to parties order
Show comments