मुंबई : हवेच्या कमी दाबाची रेषा आणि वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह उन्हाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य उत्तर प्रदेशापासून तेलंगाणापर्यंत आणि आसामपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारे, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

गुजरातमध्ये १५ एप्रिलपासून पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढीचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होईल आणि त्यानंतर तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अकोल्यात देशात सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पश्चिमी विक्षोप म्हणजे हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झोतामुळे संपूर्ण उत्तर भारत, मध्य भारत आणि ईशान्य भारतात पाऊस, गारपीट होत आहे. त्याचा राज्यावर काहीही परिणाम होत नाही.

वादळी वारे, मेघगर्जनेह पावसाचा पिवळा इशारा

रविवारी – सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,

सोमवारी – सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड,यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

मंगळवार – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, भंडारा.