मंगल हनवते
मुंबई : कल्याण- लातूर अंतर पार करण्यासाठी किमान १० तास लागतात, पण आता येत्या काही वर्षांत हे अंतर केवळ चार तासांत पार करता येईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण ते लातूर प्रवास सुकर आणि अतिवेगवान करण्यासाठी ४४५ किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात पाच हजारांहून अधिक किमीच्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. ‘एमएसआरडीसी’द्वारे सुमारे ४२१७ किमी, तर ‘एनएचआय’च्या माध्यमातून सुमारे १०५० किमीच्या रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पात कल्याण – लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे. मुंबई वा कल्याणवरून लातूर गाठण्यासाठी किमान दहा तास लागतात. ही बाब लक्षात घेता मुंबई – लातूर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी आता कल्याण – लातूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हा द्रुतगती महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन माळशेज घाटातून पुढे अहमदनगरला जाईल आणि मग पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूर शहर आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत संपेल.
हेही वाचा >>>अमेरिकन वकिलातीला धमकीचा ई-मेल पाठवणारा स्किझोफ्रेनियाग्रस्त
नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची तयारी ‘एमएसआरडीसी’ने केली आहे. शक्तीपीठ महामार्ग लातूरमधून जाणार आहे. लातूरमधील सिद्धेश्वर देवस्थान या महामार्गाद्वारे जोडले जाणार आहे. एकीकडे लातूरमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, तर दुसरीकडे कल्याण – लातूर द्रुतगती महामार्गाची उभारणी केली जाणार आहे.
माळशेज घाटात आठ किमीचा बोगदा कल्याण-लातूर द्रुतगती महामार्ग माळशेज घाटातून जाणार असून त्यासाठी घाटात आठ किमीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्याच वेळी मुंबई शहर आणि उपनगरवासीयांना हा महामार्ग वापरता यावा यासाठी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी कल्याण-लातूर महामार्ग जोडला जाणार आहे. तर या महामार्गासाठी ढोबळमानाने ५० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आराखडा अंतिम झाल्यानंतर प्रकल्पाचा नेमका खर्च किती हे स्पष्ट होईल.
कल्याण- लातूर या ४४५ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-लातूर प्रवास अतिवेगवान होईल. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचा आराखडा ‘एमएसआरडीसी’ तयार करणार आहे.