मुंबई : आगामी निवडणुकीत महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, हे निश्चित असून २०२९मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार आणण्यासाठी जोमाने काम करावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केले. शहा ‘शत प्रतिशत भाजप’चा नारा दिल्याने भाजपची शिंदे गट आणि अजित पवार गटाबरोबर असलेली युती पुढील निवडणुकीत तुटणार असल्याचेच संकेत मिळाले आहेत.

अजित पवार यांना सत्तेत सहभागी करुन घेतल्याने भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असतानाच शहा यांनी हे वक्तव्य केल्याने शिंदे व अजित पवार गटाचे भवितव्य काय, अशी (पान ८ वर) (पान १ वरून) चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी शहा यांनी दादर येथील योगी सभागृहात बैठक घेतली. त्यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शहा म्हणाले, महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा व दिशा बदलणारी आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा अपयश आले, पण यावेळी त्यांच्या काही जागा वाढल्याचा आनंद ते साजरा करीत आहेत. कोणत्याही सर्वेक्षणाचा विचार न करता निराशा झटकून टाकावी. या निवडणुकीत महायुतीला रोखण्याची ताकद कोणाचीही नसल्याचे शहा म्हणाले.

हेही वाचा >>> सिंधुदुर्गात पंचतारांकित हॉटेल अन् पाण्याखाली बोट प्रल्प ; पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढविल्यास महायुतीचा विजय निश्चित आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सहा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार केवळ एका विधानसभा मतदारसंघात अधिक मते घेवून विजयी झाले आहेत. त्याठिकाणी आपल्याला पाच विधानसभा मतदारसंघात विजय मिळेलच, असा याचा अर्थ आहे. त्यामुळे नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याविरुद्धची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु करावेत, अशी सूचना शहा यांनी केली.

देवेंद्र फडणवीस सक्षम

अयोध्येतील राम मंदिर, जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० हटविणे आदी कामे करण्यासाठी भाजप केंद्रामध्ये सत्तेत आली होती. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या १० वर्षांत दहशतवाद आणि नक्षलवाद गाडला गेला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करणार असल्याचे जाहीर करीत महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, असे शहा यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.