मुंबई : विधानसभेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेतील ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. त्यानुसार २५ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १२ जुलै रोजी मतदान व त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. या निवडणुकीत ११पैकी नऊ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट महायुतीने ठेवले असतानाच शिंदे गट आणि अजित पवार गटातील नाराज आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जाऊ शकतो.

भाजपचे पाच (मित्र पक्षासह), काँग्रेसचे दोन, ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गट आणि शेकापचा प्रत्येकी एक आमदार निवृत्त होत आहे. या ११ जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पाडली जाईल. विधानसभेच्या २८८ पैकी १४ जागा राजीनामे किंवा सदस्याच्या निधनामुळे रिक्त आहेत. निवडणुकीत २७४ सदस्य मतदान करणार असल्याने पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा कमी झाला आहे. विजयाकरिता पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता असेल. गुप्त मतदान पद्धती असल्याने मतांच्या फाटाफुटीची अधिक शक्यता आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होत असल्याने आमदारांना आयती संधी उपलब्ध झाली आहे. भाजपचे १०३ आमदार असून, अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपचे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिंदे गटाकडे स्वत:चे ४० तर १० अपक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार निवडून येतील. अजित पवार गटाकडे ४३ आमदारांचे पाठबळ दोन उमेदवार निवडून येण्याएवढे संख्याबळ आहे. ३६ आमदार असलेल्या काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येईल व त्यांच्याकडे अतिरिक्त मते शिल्लक राहतील. ठाकरे आणि शरद पवार गट एकत्र आल्यास त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. काँग्रेसकडील अतिरिक्त मतांच्या आधारे महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची खेळी केली जाऊ शकते. संख्याबळाच्या आधारे महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात.

हेही वाचा >>>आरटीई कायद्यातील दुरुस्तीला स्थगितीचे प्रकरण : दीड महिन्यांपासून प्रतिज्ञापत्र दाखल न करणाऱ्या सरकारला उच्च न्यायालयाचे खडेबोल

लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अजित पवार गटातील आमदारांमध्ये चलबिचल आहे. काही आमदार घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या काही आमदारांना भवितव्याची चिंता असून तेदेखील गोंधळलेले आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गटाची मते फुटल्यास महायुतीचे गणित बिघडू शकते. शेकापच्या जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नसतानाही तीन वेळा अन्य पक्षांच्या मदतीने ते निवडून आले आहेत. ते या वेळीही चाचपणी करीत आहेत. काँग्रेसकडील अतिरिक्त मतांच्या आधारे ते रिंगणात उतरू शकतात. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतांची फाटाफूट झाली होती. त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते. कालांतराने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते.

विजयाचे ‘गणित’

विधानसभेच्या २८८ पैकी १४ जागा रिक्त

२७४ सदस्यांमधून ११ जणांची निवड

पहिल्या पसंतीच्या २३ मतांची गरज

निवृत्त होणारे आमदार

● भाजप : विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील महादेव जानकर (मित्र पक्ष) ● काँग्रेस : डॉ. वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव ● ठाकरे गट : अनिल परब ● शिंदे गट : मनीषा कायंदे ● अजित पवार गट : बाबाजानी दुर्राणी शेकाप : जयंत पाटील