लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : जे. जे. रुग्णालयामध्ये १९९२ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी त्रिभुवन सिंह (६२) याला गुन्हे शाखेने अटक केली. बहिण हसिना पारकरचा पती इब्राहिम पारकर याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी कुख्यात दाऊद इब्राहिमने जे.जे. रुग्णालयात गोळीबार घडवून आणला होता.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिभुवन सिंहा हा जे.जे. गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. त्याला अटक करण्याची प्रक्रिया यापूर्वी सुरू करण्यात आली होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणात सुभाष सिंह ठाकूर आणि ब्रिजेश सिंह यांचा समावेश आहे. सिंहच्या चौकशीतून याप्रकरणाशी संबंधित माहिती पोलिसांना मिळणार आहे.

आणखी वाचा-‘बाबा सिद्दिकी नाहीतर झिशान’, शूटर्सला काय सांगण्यात आलं होतं? पोलिसांनी उलगडला धक्कादायक प्लॅन

काय आहे प्रकरण ?

हसिना पारकरचा पती इब्राहिम पारकर २६ जुलै १९९२ रोजी नागपाडा येथील जयराम लेन येथे त्याच्या हॉटेलमध्ये बसला असताना गवळी टोळीतील शैलेश हळदणकर व बिपीन शेरे यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यावेळी आरडाओरड झाली. पळून जाणाऱ्या हळदणकर व शेरेला स्थानिक रहिवाशांनी बेदम मारहाण केली. त्यात जखमी झाल्यामुळे दोघांना जे. जे. रुग्णालयातील कक्ष क्र. १८ मध्ये भरती करण्यात आले होते.

बहिणीच्या पतीचा हत्येचा सूड घेण्यासाठी १९९२ मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने सर जे.जे. रुग्णालयात आरोपींना मारण्याचा कट रचला. जे. जे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील १८ क्रमांकाच्या कक्षात सप्टेंबर १९९२ मध्ये दाऊद टोळीचे गुंड शिरले. तत्पूर्वी एका महिलेने या कक्षाची पाहणी केली होती. कक्षात किती सुरक्षा रक्षक आहेत, शेरे व हळदणकर कोठे उपचार घेत आहेत, याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री दाऊदच्या टोळीतील सुनील सावंत, सुभाषसिंह ठाकूर, श्यामकिशोर गारिकापट्टी यांच्यासह इतर गुंड रुग्णालयात घुसले व त्यांनी बेछुट गोळीबार केला.

आणखी वाचा-महाविकास आघाडीतील वाद निवळला; चेन्निथला उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’ वर; दोन दिवसांत जागावाटपाची घोषणा

या हल्ल्यात शैलेश जागीच ठार झाला. तर शेरे गंभीर जखमी झाला. यावेळी सुरक्षेला तैनात पोलीस शिपाईल चिंतामण जयस्वाल व केवलसिंह भानावत यांचाही मृत्यू झाला. या हल्लात वैद्यकीय कर्मचाऱ्यासह पाच जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यातच हल्लेखोरांनी हल्ल्यात लाल दिव्याच्या गाडीचा वापर केल्याचे उघड झाल्यामुळे सरकारी यंत्रणाही हादरली होती. या संपूर्ण प्रकरणात एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली होती.