Malad Mob Lynching Update News : मालाड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ १३ ऑक्टोबर रोजी भयंकर घटना घडली. रिक्षाचालकाबरोबर झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या मारहाणीत मृत झालेला तरुण मनसेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

नेमकं प्रकरण काय?

आकाश माईन (वय ३१) १३ ऑक्टोबर रोजी मालाड पूर्व शिवाजी चौक येथून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पुढे जाणाऱ्या रिक्षा चालकाने रिक्षा अचानक वळवल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्याचे एका रिक्षाचालकाशी भांडण झाले. वाद वाढल्यानंतर रिक्षा चालकाचे मित्र, स्थानिक फेरीवाले तेथे जमले. जमलेल्या सुमारे १० ते १५ जणांनी मनसे कार्यकर्ता आकाश याच्यावर हल्ला केला. लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आकाश माईनचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशच्या पायाला, हाताला, पोटावर व कंबरेला मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >> मुंबई : मनसे कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना अटक

संदीप देशपांडे काय म्हणाले?

“आकाश माईन हा विभाग सचिवांचा मुलगा होता. तो हैदराबादला राहतो. दसऱ्यासाठी तो मुंबईत आला होता. बाईकवरून जात असताना रिक्षावाल्यांबरोबर त्याचं किरकोळ भांडण झालं. तिकडे आजूबाजूच्या रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांनी मिळून मॉब लिंचिग केलं. त्यानंतर त्याला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेलं. परंतु, त्याला तिथे व्यवस्थित उपचार दिले नाहीत. तेथील डॉक्टरांनी तो आऊट ऑफ डेंजर आहे असं सांगितलं, पण घरी आल्यावर रात्री त्याचा मृत्यू झाला”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

“आमच्या कार्यकर्त्यांनी डीसीपी यांच्याशी चर्चा केली आहे. याप्रकरणी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारची भीती असली पाहिजे आणि यामुळे अशा घटना घडत आहेत”, असंही ते पुढे म्हणाले.

आरोपींविरोधात आधीही अनेक गुन्हे दाखल

आकाश यांची पत्नी अनुश्री माईन यांच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने अविनाश नामदेव कदम, अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दिपक आमटे, राकेश मलकु ढवळे, साहिल सिकंदर कदम यांना अटक केली आहे. अविनाश कदम विरोधात यापूर्वी पंतनगर व बोरीवली पोलीस ठाण्यात मारामारी व अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आदित्य सिंह व जयप्रकाश आमटे विरोधात २०१९ मध्ये दिंडोशी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी दगडाने मारहाण करून एकाचा खून केला होता. पोलिसांनी हत्येत वापरलेला दगडही जप्त केला होता. याप्रकरणात आरोपी वैभव सावंत व इतर व्यक्तींचाही सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. दरम्यान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आकाशवरील हल्ल्याबाबत ट्वीट करून मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.