मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ३० वर्षीय तरूणाला बिहारमधून नुकतीच अटक केली होती. त्याची मानसिक स्थिती ठीक नसून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. बचाव पक्षाकडून आरोपीचा वैद्यकीय अहवाल व डॉक्टरांची चिठ्ठी न्यायालयात सादर करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा >>> लैगिक अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी तृतीयपंथीवर हल्ला

सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी व सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून दोन दूरध्वनी आले होते. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स रूग्णालय उडवून देण्याची धमकी दिली. तसेच मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, आकाश अंबानी व अनंत अंबानी यांना जीवे मारण्याची आणि अंबानी कुटुंबियांचे अँटेलिया हे निवासस्थान उडवण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रार करण्यात आल्याचे रिलायन्स समुहाकडून सांगण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने त्याबाबत डी. बी. मार्ग पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा >>> ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. याप्रकरणी तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. त्यातील एका पथकाने बिहारमधील दरभंगा येथून राकेश मिश्रा (३०) या आरोपीला अटक केली. धाक निर्माण करण्यासाठी आरोपीने पुलवामा हल्ला आम्ही केला होता, मुंबई हल्ला आम्ही घडवून आणला होता. पुलवामामध्ये कसे लोकांना उडवले, त्याप्रमाणे उडवून देऊन असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी तक्रारीत ही बाब नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमधील सर्व माहिती डिलीट करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच पोलीस आरोपीविरोधात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम वाढवण्याची शक्यता आहे.