Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency 2024 SP Abu Azmi vs NDA : मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ पासून हा मतदारसंघ समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे राहिला आहे. अबू आझमी सलग तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी असून त्यावर अबू आझमी यांची पकड आहे. या मतदारसंघात सध्या तरी आझमी यांना कोणीच आव्हान देऊ शकेल अशी परिस्थिती दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरोधात बहुसंख्य विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह इतर अनेक पक्ष यात सहभागी झाले आहेत. इंडिया आघाडी महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून ओळखली जात असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अबू आझमीच मानखुर्द-शिवाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.

मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीचा अभेद्य गड मानावा लागेल. कारण या मतदारसंघातील ६० टक्के मतदार शिवाजीनगरमध्ये राहतात, तर ४० टक्के मतदार मानखुर्दमध्ये राहतात शिवाजीनगरमध्ये बहुसंख्य मुस्लीम समुदाय वास्तव्यास असून मतदारांच्या या गटावर अबू आझमी यांची पकड आहे. तर मानखुर्दमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाचं वर्चस्व आहे. इतर कोणत्याही पक्षाला आजवर या मतदारसंघात हातपाय पसरता आलेले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांच्या मते अबू आझमींना यापूर्वीच्या निवडणुकांप्रमाणे या मतदारसंघात सध्या तरी मोठं आव्हान नाही. महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप झालेलं नसलं तर ही जागा सपालाच सुटेल यात शंका नाही. सपा विद्यमान आमदार अबू आझमी यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊ शकते.

हे ही वाचा >> काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?

मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये महाविकास आघाडी ‘पॉवरफुल्ल’

दुसऱ्या बाजूला महायुतीत ही जागा कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित नाही. सपा, शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस या तीन पक्षांव्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाला या मतदारसंघात अद्याप ओळख निर्माण करता आलेली नाही. अबू आझमी यांनी या मतदारसंघात केवळ शिवसेनेचा ठाकरे गटच टक्कर देऊ शकतो अशी स्थिती आहे. मात्र सध्या ठाकरे गट व अबू आझमी एकत्र असल्यामुळे महाविकास आघाडीची या मतदारसंघात मोठी ताकद निर्माण झाली आहे. याशिवाय मनसेचाही येथे लहानसा मतदारवर्ग आहे. यापूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या आप्पासाहेब वगरे यांनी आझमींविरोधात २१ हजार मतं मिळवली होती. तर २०१९ च्या निवडणुकीत संयुक्त शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांना ४३ हजार मतं मिळाली होती.

हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

अबू आझमी (सपा) – ६९,०३६ मतं
विठ्ठल लोकरे (शिवसेना) – ४३,४२३ मतं
सुरैय्या अकबर शेख (वंचित) – १०,४५१ मतं

हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

अबू आझमी (सपा) – ४१,७२९ मतं
सुरेश पाटील (शिवसेना) – ३१,७८२ मतं
युसुफ अब्राहनी (काँग्रेस) – २७,४७४ मतं

हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?

२००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

अबू आझमी (सपा) – ३८,४३५ मतं
सय्यद अहमद (काँग्रेस) – २४,३१८ मतं
आप्पासाहेब वगरे (मनसे) – २१,८३८ मतं