आगामी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर पंजाबमधून संत नामदेव गुरुद्वारा आणि अन्य आठ ठिकाणांहून संमेलनासाठी आमंत्रणे आली आहेत. मात्र येत्या ३१ मे रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळनिवड समितीची स्थापना होणार असून त्यानंतरच संमेलन कुठे घ्यायचे याचा निर्णय होणार आहे.
८७ वे साहित्य संमेलन सासवड येथे झाले होते. पुढील साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी दहा ठिकाणांहून आमंत्रणे आली आहेत. त्यापैकी एक आमंत्रण बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेचे आहे. अन्य ठिकाणांमध्ये सातारा, कल्याण, कळवा, कणकवली, जालना, उस्मानाबाद, तळोडी-चंद्रपूर, डोंबिवली आणि संत नामदेव गुरुद्वारा सभा- गुमान, पंजाब यांचा समावेश आहे.
संमेलनस्थान ठरवण्यासाठी सर्वप्रथम स्थळनिवड समितीची स्थापना होते. ही समिती आमंत्रण आलेल्या प्रत्येक ठिकाणी भेट देऊन पाहणी करते. तसेच आयोजक संस्था संमेलन भरविण्यासाठी किती सक्षम आहे, याबाबतही संबंधितांशी चर्चा करते. या समितीच्या अहवालानंतरच संमेलन स्थळ निश्चित केले जाते, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. साहित्य महामंडळाची बैठक ३१ मे रोजी पुण्यात होत आहे. त्या बैठकीत स्थळनिवड समितीची स्थापना केली जाईल, असेही डॉ. वैद्य म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बडोदेकरांची २०११मध्ये माघार
या अगोदर २०११ मध्ये ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. महामंडळ आणि आयोजक संस्थेकडून तसे जाहीरही झाले. मात्र त्यानंतर आयोजकांनी काही  कारणामुळे आम्ही संमेलन बडोदा येथे घेऊ शकत नाही, असे महामंडळाला कळवून महामंडळाची पंचाईत करून टाकली होती. त्यानंतर हे संमेलन चंद्रपूर येथे झाले होते. या वेळी बडोदेकर उत्सुक असले तरी त्यांचा मागच्या वेळचा अनुभव महामंडळाच्या गाठीशी आहे. त्यामुळे या वेळी बडोद्यावर विचार करताना हा पूर्व इतिहासही तपासला जाईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi sahitya sammelan to be in punjab gujrat