राज्यातील विद्यापीठे आणि अन्य संस्था- संघटनांकडून अन्य भाषकांना मराठी शिकविण्याच्या प्रक्रियेचे दस्तावेजीकरण केले जावे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता वर्गाचे माजी प्रपाठक आणि मराठीचे अभ्यासक प्र. ना. परांजपे यांनी गुरुवारी येथे केले.
मुंबई विद्यापीठाच्या मराठी आणि जर्मन भाषा विभागातर्फे कालिना, विद्यानगरीत आयोजित करण्यात आलेल्या ‘अन्य भाषकांसाठी मराठीचे अध्यापन-वर्तमान स्वरूप आणि भवितव्य’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. ‘अन्य भाषकांसाठी मराठीचे अध्यापन-अनुभवकथन’ या विषयावरील परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात वझे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रकाश परब आणि परदेशी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकविणाऱ्या डॉ. विजया देव हे वक्ते सहभागी झाले होते. ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांचे या कार्यशाळेत बीजभाषण झाले.
जे अन्य भाषक मराठी विषय/ भाषा शिकतात ते प्रामख्याने प्रौढ वयोगटातील असतात. तसेच या प्रत्येकाचा मराठी शिकण्याचा उद्देशही वेगवेगळा असतो. या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, अशी पुस्तके मोठय़ा प्रमाणात तयार व्हावीत, असे सांगून परांजपे म्हणाले की, विद्यापीठातील विविध भाषा विभागांनी भाषांतर विभाग सुरू करावा आणि मराठीतील निवडक साहित्य अन्य प्रादेशिक भाषेत तसेच अन्य भाषेतील साहित्य मराठी भाषेत अनुवादित व्हावे. मराठी भाषेत जे शब्द जास्तीत जास्त प्रमाणात वापरले जातात, त्याचा कोश तयार केला जावा. अन्य भाषकांना मराठी शिकविण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल.
परदेशी विद्यार्थ्यांना शिकविण्याचे आपले अनुभव मांडताना डॉ. विजया देव म्हणाल्या की, अन्य भाषकांना शिकविण्यासाठी साधनसामग्री उपलब्ध असली तरी ती पुरेशी नाही. माझ्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविण्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. यात मराठीतील गोष्टींची पुस्तके त्यांच्याकडून वाचून घेणे, तो समाजात वावरताना त्याला बोलताना काही समस्या येऊ नयेत म्हणून कल्हईवाला, पोष्टमन, फुलवाला, रिक्षाचालक, डॉक्टर यांना घरी बोलावून त्यांचा संवाद या विद्यार्थ्यांशी घडवून आणला. प्रकाश परब यांनी सांगितले की, नवीन पिढीला मराठी भाषेत अध्ययन करावे, असे वाटत नाही. आपल्याविद्यापीठांनीही उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून प्रादेशिक भाषा सशक्त केल्या नाहीत तर इंग्रजीचेच सबलीकरण केले. मराठी भाषा टिकविणे, वाढविणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, असे आपण म्हणतो, तेव्हा ते उत्तरदायीत्व आपण प्रत्येकजण स्वीकारतो का, असा सवालही परब यांनी केला. या सत्राचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सुहासिनी किर्तीकर यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा