मुंबई : सकाळपासूनच वाढणारा असह्य उकाडा आणि सकाळी ११ पासून सायंकाळपर्यंत होणारी लाहीलाही असा अनुभव सध्या मुंबईकरांना येत आहे. उकाड्यातून सुटका होणे दूरच, उलट तो वाढण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईत पुढील तीन – चार दिवस कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर तसेच उपनगरांत गेल्या आठवड्यात मुसळधार कोसळला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. वातावरणाच्या उष्णतामानात वाढ होत आहे. यामुळे असह्य उकाडा सहन करावा लागत असून, वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात भर पडत आहे. या स्थितीत पुढील तीन ते चार दिवस मुंबईत कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचबरोबर मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा – आरे – बीकेसी भुयारी मेट्रो लोकार्पण : विरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला – पंतप्रधान मोदी

हेही वाचा – मुंबई : खासदार पुत्राच्या मोटरगाडीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी, गणेश हंडोरे अटकेत

दरम्यान, मुंबईबरोबरच राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून शनिवारी मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासास पोषक वातावरण असल्याने पुढील दोन – तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांतून मोसमी वारे परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाची उघडीप असलेल्या भागात मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे.