मुंबई : लाल महलातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेने हटविल्यावर पुणे शहराच्या काही भागांमध्ये हिंसाचार घडवून आणण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती तथा तत्कालीन आमदार नीलम गोऱ्हे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी चिथावणी दिली होती. उभयतांच्या दूरध्वनीवरील संभाषणातून ही बाब पुढे आली होती, असा खळबळजनक दावा निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे महानगरपालिकेने २३ डिसेंबर २०१० रोजी लाल महलातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविला होता. या विरोधात शिवसेना आणि अन्य काही संघटनांनी २८ डिसेंबरला ‘पुणे बंद’ची हाक दिली होती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी काही नेतेमंडळींचे दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) करण्याचा निर्णय घेतला. नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांनी पुणे शहराच्या काही भागांमध्ये रास्ता रोको, बस आणि ट्रकची जाळपोळ, दगडफेक करण्याच्या सूचना करीत हिंसाचार घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला, असे त्यांच्या संभाषणातून समोर आले होते. दंगल घडवून आणण्यासाठी गोऱ्हे आणि नार्वेकर यांनी कटकारस्थान रचल्याचा ठपका बोरवणकर यांनी ठेवला आहे. ‘‘गोऱ्हे आणि नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना मी पोलीस अधिकाऱ्यांना केली असता ते फारसे उत्सुक दिसले नाहीत. माझ्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच माझ्या आदेशाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून पालन केले गेले नव्हते’’, असे बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटले आहे.

हेही वाचा >>>Samruddhi Highway: देशातील सर्वाधिक रुंद आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तयार; समृद्धी महामार्गाच्या १४ व्या पॅकेजचे काम पूर्ण

‘‘माझी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आम्हाला बघायला आवडेल, अशी भावना त्यावेळी अतिरिक्त आयुक्ताने व्यक्त केली होती. गोऱ्हे किंवा नार्वेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू नये, असेच या अतिरिक्त आयुक्ताने सुचविले होते. स्थानिक पोलिसांचा विरोध डावलून दंगलीस चिथावणी दिल्याच्या आरोपांवरून मी गोऱ्हे आणि नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते. तसेच खटला लढविण्यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती केली होती’’ असे बोरवणकर यांनी नमूद केले आहे.

गोऱ्हे आणि नार्वेकर यांच्या हातून इतका गंभीर गुन्हा घडूनही राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल झाल्यावर खटला मागे घेण्यासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले. न्यायालयाने सुरुवातीला दोघांच्या विरोधातील खटला मागे घेण्याची सरकारची विनंती फेटाळून लावली होती. पण २०१७ मध्ये गोऱ्हे आणि नार्वेकर यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात आला.

हेही वाचा >>>मुंबईकरांचा श्वास कोंडला! वाढत्या प्रदुषणामुळे मास्क वापरण्याचं आवाहन? पालिकेने दिलं स्पष्टीकरण…

अजित पवारांचा ‘निर्विकार’ इन्कार

येरवडय़ातील जमीन विकासकाला हस्तांतरित करण्यावरून अजित पवार यांनी दबाव आणला होता, या बोरवणकर यांच्या दाव्यामुळे खळबळ माजली. अजित पवारांना इन्कार करावा लागला. आणखी एका प्रकरणाचा उल्लेख करीत बोरवणकर यांनी अजित पवार यांनी आपल्यासमोर कसा इन्कार केला, याचा अनुभव कथन केला आहे. पुण्यातील बिबवेवाडी भागात दंगल झाली होती. ‘‘येरवडा प्रकरणावरून बहुधा संतप्त झालेल्या पाकमंत्र्यांनी ‘पोलीस आयुक्तांच्या विरोधात काहीतरी करावे लागेल’ अशी मुलाखत वृत्तवाहिन्यांना दिली होती. माझी बदली करा किंवा मी सुट्टीवर जात असल्याचे मी पोलीस महासंचालकांना कळविले. त्यावर मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांनी टोकाची भूमिका घेऊ नका, असा सल्ला दिला होता. त्यानंतर मी पालकमंत्र्यांना भेटून माझ्याबद्दलच्या विधानाबद्दल विचारणा केली असता त्यांनी निर्विकारपणे विधानाचा इन्कार केला होता. त्याबद्दल मला आश्चर्याचा धक्का बसला होता’’, असा अनुभव बोरवणकर यांनी नमूद केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meera borwankar book makes sensational claims about milind narvekar and neelam gorhe amy