स्कूलबसची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवण्याची तरतूद असलेला १८ नोव्हेंबर रोजीच वादग्रस्त शासननिर्णय अखेर शालेय शिक्षण विभागाने मागे घेतला. पण त्याचवेळी स्कूलबससंदर्भातील १४ सप्टेंबर २०११ रोजीचा शासननिर्णय लागूच राहणार असल्याचे शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी सांगितले. त्यामुळे मुख्याध्यापकांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आणि स्कूलबस व्यतिरिक्त अन्य वाहनांना मनाई हे प्रमुख र्निबध जुन्या निर्णयातही समाविष्ट असल्याने स्कूलबसबाबतचा गोंधळ कायम आहे. या परिस्थितीला शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा आणि अतिरिक्त मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्यातील मतभेद कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
स्कूलबस नियमावलीबाबत १८ नोव्हेंबरच्या निर्णयाला सर्वच स्तरातून प्रचंड विरोध झाला. मुख्याध्यापकांनी तर परीक्षेवर बहिष्काराचे अस्त्र उपसले आहे. मंत्र्यांना अंधारात ठेवून सचिवांनी परस्पर निर्णय घेतला गेल्याचेही उघड झाले. जोरदार विरोधामुळे शालेय शिक्षण विभागाला माघार घ्यावी लागली. शिक्षणमंत्री दर्डा यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली. त्यानंतर १८ नोव्हेंबरच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा आदेश मंगळवारी दुपारी जारी करण्यात आला. सुधारित धोरण नव्याने जारी करण्यासाठी या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले. सर्व संबंधितांशी चर्चा करून नवीन निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, पण  १४ सप्टेंबर २०११ रोजीचा शासननिर्णय मंत्रिमंडळ निर्णयावर आधारित असून तो कायम असल्याने मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे सचिव सहारिया यांनी सांगितले. त्यामुळे स्थगितीनंतरही गोंधळ कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुनी नियमावली अधिक गोंधळाची
* विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापकांवरच आहे. नवीन निर्णयात स्कूलबस व्यतिरिक्त अन्य वाहनांवर सरसकट बंदी घालण्यात आली होती. पण जुन्या निर्णयानुसार, शाळेच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर परिसरात स्कूलबसव्यतिरिक्त कोणतीही खासगी वाहने, रिक्षा, टॅक्सी आदींना वाहन थांबविण्याचीही परवानगी नाही.
* रिक्षा, खासगी गाडीने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाहन १०० मीटरबाहेर रोखले गेल्यावर विद्यार्थ्यांने एकटय़ाने हे अंतर कापणे व शाळेत येणे अपेक्षित धरले आहे. तेथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची, हे मात्र स्पष्ट नाही.
* १०० मीटरबाहेर रिक्षा किंवा अन्य वाहन थांबविले आणि विद्यार्थ्यांला काही अपघात झाला, पळवून नेण्याचे प्रकार झाले, तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची, याबाबत तरतूद नाही.

मंत्री आणि सचिवांमधील समन्वय आणि अभ्यासाअभावी स्कूलबसविषयीची सुधारित नियमावली मागे घेण्याची नामुष्की शालेय शिक्षण विभागावर ओढवली. मात्र अशी नामुष्की ओढवण्याची ही या विभागाची पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक विषयांसंबंधात गृहपाठ कच्चा पडल्याने न्यायालयाकडून फटके खाण्याची, त्याबरहुकूम बदल करण्याची नामुष्की विभागावर आली आहे. त्याचा हा थोडक्यात आढावा..
* सेवेत नसलेल्या शिक्षकांबरोबरच सेवेतील सर्वच शिक्षकांना सरसकटपणे ‘टेट’ ही पात्रता परीक्षा लागू करण्याच्या निर्णयावरून शालेय शिक्षण विभाग असाच तोंडघशी पडला. कार्यरत शिक्षकांना हा नियम लागू करण्यास मोठा आक्षेप होता. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर विभागाला टेटची अट केवळ यापुढे सेवेत रूजू होणाऱ्या शिक्षकांपुरती मर्यादित करावी लागली.
* सहावी ते आठवीच्या स्तरावर शिकविणाऱ्या शिक्षकांना पदवीची अट लागू करणारा निर्णय असाच. न्यायालयाने याही निर्णयावरून विभागाला धारेवर धरले. शेवटी हा नियम, नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांना लावावा लागला.
* पटपडताळणीमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे कारण पुढे करत विभागाने शिक्षक भरती बंद केली. त्यावरूनही न्यायालयाने विभागाला फटकारले. किमान इंग्रजी, गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची भरती सुरू करावी, असे न्यायालयाने बजावले.
रखडलेले निर्णय
* खासगी शाळांचे शुल्क नियंत्रण करणारा कायदा राष्ट्रपतींच्या परवानगीच्या नावाखाली गेली तीन वर्षे प्रलंबित.
* पूर्व प्राथमिक वर्गाचे प्रवेश, शुल्क आदींचे नियमन करण्यासंदर्भात पुरेसा अभ्यासाअभावी हा विषयही रखडलेल्या यादीच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
* २५ टक्के प्रवेशांबाबत ठाम भूमिकेअभावी असलेला गोंधळ
* सर्व शाळांना सामाईक वेळापत्रक लावण्याबाबत होणारी चालढकल
‘स्कूलबस’बाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय मागे घेतला आहे.
योग्य नियमावली लवकलच तयार करणार..
मुख्याध्यापकांवरील जबाबदारी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा या मुद्दय़ावरून झालेल्या विरोधामुळे शासनाने १८ नोव्हेंबर रोजी जारी केलेला निर्णय मागे घेतला आहे. येत्या आठ दिवसांत संबंधितांशी चर्चा करून योग्य ती नियमावली तयार करण्यात येईल.
-राजेंद्र दर्डा,
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

या विषयी मान्यवरांच्या प्रतिक्रिया..
दहावी-बारावीच्या परीक्षांवरील बहिष्कार मागे..
स्कूल बसच्या निर्णयाबाबत योग्य तो विचार न झाल्यास मुख्याध्यापक महासंघाने दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे ठरविले होते. मात्र शासनाने एक पाऊल पुढे येऊन निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परीक्षांवरील बहिष्कार मागे घेण्यात आले असून आम्ही शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत आहोत.
– प्रशांत रेडीज,
प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महासंघ

सर्वाना विश्वासात घेतले असते तर ही वेळ आली नसती..
स्कूल बसचा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने सर्व घटकांना विचारात घेतले असते तर ही वेळ आली नसती. या नियमावलीनिरोधात शिक्षक परिषदेचे सर्व आमदार हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार होते. तसे निवेदन शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाला दिले होते. या प्रकरणावरून शिक्षण विभागाने धडा घेऊन भविष्यात सर्वाना विश्वासात घेऊन मगच शासन निर्णय घ्यावा.
– अनिल बोरनारे,
संघटन मंत्री, शिक्षक परिषद.