मुंबई : ‘‘मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट केली जात आहे. त्यासाठी मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) सह ३५७ किलोमीटरच्या मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यात १४ मेट्रो मार्गिकांचा समावेश असून, या सर्व मार्गिका २०४० पर्यंत कार्यान्वित होतील आणि मेट्रो ही मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरेल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘लोकसत्ता शहरभान’मध्ये त्या बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘मेट्रोसह मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात सागरी किनारा मार्ग, भुयारी मार्ग असे प्रकल्प उभारले जात आहेत. इंग्रजांनी ज्याप्रमाणे पायाभूत सुविधा साकारताना १५० वर्षांसाठीची तरतूद केली तशीच पुढील १५० ते २०० वर्षांची तरतूद मेट्रोसह आता सुरू असलेल्या विविध प्रकल्पांतून होणार आहे’’, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >>> वादग्रस्त विधाने टाळा! आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मंत्र्यांना सूचना

‘‘मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात लोकसंख्या वाढते आहे.  वाढत्या शहराचे व्यवस्थापन करणे मोठे आव्हान आहे. ते पेलण्याचा एक भाग म्हणून मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला. मेट्रोची संकल्पना तशी फार आधीच मांडली गेली. पण, आपल्याकडे उपनगरीय रेल्वे पुरेशी होती म्हणून मेट्रोची गरज भासली नाही. मात्र, रेल्वेवरील ताण वाढला तेव्हा आपण मेट्रो प्रकल्प हाती घेतला. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून २००४ मध्ये ३५७ किमीचा आणि १४ मार्गिकांचा मेट्रोचा आराखडा तयार करण्यात आला’’, असे भिडे यावेळी म्हणाल्या.

‘एमएमआरडीए’च्या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो ३ मार्गिकेची जबाबदारी ‘एमएमआरसी’वर आहे. ३३.५ किमीची ही मार्गिका अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागत आहे. त्याबाबत भिडे म्हणाल्या, ‘‘मुंबईतील पहिली पूर्णत: भुयारी असलेली मेट्रो ३ मार्गिका पूर्णत्वास नेणे हे आर्थिक, तांत्रिकदृष्टय़ा मोठे आव्हान होते. ती सर्व आव्हाने पेलत आज मेट्रो ३ मधील आरे ते बीकेसीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यांतच हा पहिला टप्पा सुरू होईल आणि पहिल्या भुयारी मेट्रोतून मुंबईकरांना प्रवास करता येईल.

मेट्रो ३ चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पुढील सहा-सात महिन्यांत बीकेसी ते कुलाबा असा दुसरा टप्पा सेवेत दाखल होईल. मेट्रो ३ नंतर एक-दोन वर्षांत आणखी काही मेट्रो मार्गिका सुरू होतील. या मार्गिका एकमेकांना जोडल्या जातील आणि २०४० मध्ये शहरभर मेट्रोचे जाळे उभे राहील, असे भिडे म्हणाल्या.

शहर कसे धावते, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमागे किती यंत्रणा, कशा कार्यरत असतात, याचे भान वाढवणाऱ्या ‘लोकसत्ता शहरभान’च्या सत्रात अश्विनी भिडे यांच्याशी संवाद रंगला. सारस्वत को-ऑप बँक लि. च्या शिल्पा मुळगांवकर, वीणा वल्र्डचे दीपक जाधव यावेळी उपस्थित होते. कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सागरी किनारी मार्गाचा पहिला टप्पा मेपर्यंत सेवेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करताना रस्ते प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी दूर करणेही आवश्यक होते. त्यामुळेच पालिकेच्या माध्यमातून सागरी किनारा रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाचे कामही वेगात सुरू आहे. फेब्रुवारी ते मे २०२४ या कालावधीत हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल, असे भिडे यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पामुळे वाहतुक कोंडी दूर होणार असून, नरिमन पॉईंटवरून वरळीला १० मिनिटांत पोहोचता येईल, असेही त्या म्हणाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro train will be the new lifeline for mumbai says bmc additional commissioner ashwini bhide zws