मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्याची जबाबदारी असलेल्या म्हाडाने २०२५-२६ मध्ये राज्यभरात तब्बल १९ हजार ४९७ घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट ठेवले आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी म्हाडाने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात गृहप्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे. म्हाडाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या १५९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात गृहनिर्मितीसाठी तब्बल ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई मंडळाच्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पत्राचाळीतील गृहनर्मिती, जोगेश्वरीतील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासासह अन्य प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत वर्षभरात ५१९९ घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान, प्राधिकरणाच्या बैठकीत २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारीत अर्थसंकल्पालाही मान्यता देण्यात आली.
मुंबई मंडळासाठी ५७४९.४९ कोटींची तरतूद
म्हाडाच्या अर्थसंकल्पात मुंबई, कोकण, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आदी विभागीय मंडळातील विविध प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मंडळामार्फत चालू आर्थिक वर्षात ५१९९ घरांची निर्मिती करण्यात येणार असून यासाठी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ५७४९.४९ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तर जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी वसाहत पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी ५७३ कोटी रुपये, परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुला-मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीकरीता २० कोटी रुपये, गिरणी कामगारांच्या घरासाठी ५७.५० कोटी रुपये, बोरिवली सर्वे क्रमांक १६० वरील योजनेसाठी २०० कोटी रुपये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी १७७.७९ कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी ५० कोटी रुपये, मागाठाणे बोरिवली योजनेसाठी ८५ कोटी रुपये, एक्सर बोरिवली तटरक्षक दल योजनेसाठी ३० कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोकणात वर्षभरात ९९०२ घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट
मुंबई मंडळापाठोपाठ सर्वाधिक आर्थिक तरतूद कोकण मंडळातील प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. कोकण मंडळामार्फत चालू वर्षात ९९०२ घरांच्या निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून हे उद्दीष्ट गाठण्यासाठी अर्थसंकल्पात १४०८.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण मंडळाअंतर्गत पाचपाखाडी – ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केयर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी १५ कोटी रुपये, माजिवाडे – ठाणे विवेकानंद नगर येथे १०० खाटांचे वृद्धाश्रम व नोकरदार महिलांसाठी वसतिगृह उभारण्याकरीता ३० कोटी रुपये, विरार बोळींज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करण्यासाठी ३३.८५ कोटी रुपये, वर्तकनगर – ठाणे पोलीस वसाहत इमारतींचा पुनर्विकास कामासाठी ९० कोटी रुपये, गोठेघर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (शहरी) ११५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
इतर मंडळांसाठीही तरतूद
पुणे मंडळाअंतर्गत १८३६ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५८५.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागपूर मंडळाअंतर्गत ६९२ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.त्यासाठी १००९.३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत १६०८ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी २३१.१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक मंडळाअंतर्गत ९१ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती मंडळाअंतर्गत १६९ सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी अर्थसंकल्पात ६५.९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर नागपूर मंडळांतर्गत चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी ३७१.२० कोटी रुपये, टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी ३५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.