मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठीची अर्ज विक्री – स्वीकृतीची प्रक्रिया गुरुवारी रात्री १२ वाजता संपुष्टात आली. त्यापूर्वी गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत एक लाख ६ हजारांहून अधिक अर्ज अनामत रकमेसह सादर झाले आहेत. त्यानुसार एका घरामागे सरासरी ५३ अर्ज सादर झाले आहे. तर शेवटच्या मुदतीपर्यंत अर्जसंख्या एका घरामागे ५७ ते ६० अशी होण्याची शक्यता आहे.

मुंबई मंडळाच्या विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री- स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रक्रियेस १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री ११.५९ वाजता अर्ज स्वीकृती आणि अर्ज विक्रीची मुदत संपुष्टात आली असून या मुदतीत सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा – गिरगाव चौपाटीवर ड्रोन उडवणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा, हरवलेली ३९ मुले कुटुंबियांकडे सुपूर्द

मुंबई मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत एक लाख ३० हजार जणांनी अर्ज भरले आहेत. तर यापैकी एक लाख सहा अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार एका घरामागे ५३ अर्ज सादर झाले आहेत. अर्ज विक्री – स्वीकृतीची मुदत संपुष्टात येण्यास चार तासांचा कालावधी शिल्लक असतानाची ही संख्या आहे. पुढील चार तासांत अर्ज विक्री – अर्ज स्वीकृतीच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार अनामत रकमेसह दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या एक लाख १५ हजार ते एक लाख २० हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास एका घरामागील अर्जसंख्या ५७ ते ६० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान २०३० घरांसाठी इतक्या मोठ्या संख्येने अर्ज आल्याने मुंबई मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा – तबेल्यांच्या स्थलांतरास विरोध, आरे वसाहतीमध्ये जागा देण्याची दूध उत्पादक संघटनेची मागणी

मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी पात्र उमेदवारांची यादी ३ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान आता अर्ज विक्री – स्वीकृतीची प्रक्रिया पार पडल्याने अर्जदारांचे लक्ष ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीकडे लागले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे.