मुंबई : ठाण्याचे वाढते नागरीकरण आणि त्यातून निर्माण झालेली पाणीटंचाई काळू धरणाच्या माध्यमातून कायमस्वरूपी सोडविला जाईल. तोवर देहरजे धरण आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) अतिरिक्त २५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा परिसरातील पाणीटंचाईबाबत जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिल्ली जाणार नाही. शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता देहरजे धरणातून ठाण्यासाठी १०० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे एमआयडीसीकडून ठाण्यासाठी १०० दशलक्ष लिटर आणि कळवा-मुंब्रा-दिवा भागासाठी ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्यासाठीचा प्रस्ताव औद्याोगिक विकास महामंडळाने जलसंपदा विभागास पाठविला असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल, असेही शिंदे यांनी सांगितले. तसेच ठाण्याचा पाण्याचा पश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून काळू नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी वन विभागाच्या जागेसाठी ३५० कोटी रुपये वन विभागाकडे जमा करण्यात आले आहेत. तसेच या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला आल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
मुंब्रा, कळवा भागात सहा जलकुंभ
मुंब्रा, कौसा व कळवा भागात सध्या प्रतिदिन १३०.५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा पूर्ण दाबाने होण्यासाठी या भागात सहा जलकुंभांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये दोन जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित चार जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी सरकारने नगरोत्थानमधून २४० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
विटाव्यातील टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न
एमआयडीसीकडून विटावा भागात रात्री १२ ते ५ यावेळी पाणीपुरवठा बंद केला जात होता. मात्र या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रात्री १२ ते ५ या कालावधीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात येतील. ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळजोडण्या घेण्यात आल्या असतील, तर याबाबत तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला.