मुंबई : राज्यभरात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी परतली आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर आल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही पारा खाली उतरण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचापासून अति थंड वारे (जेट स्ट्रीम) वाहत आहे. परिणामी उत्तर भारतातून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत थंडीची लाट पोहचली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यांत पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने घसरून ८ ते ९ अंशांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नंदुरबार, धुळे जिल्ह्यांच्या काही भागात पहाटेचे तापमान दवांक बिंदूपर्यंत पोहचले आहे. उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटेचे किमान व दुपारचे कमाल तापमान सरासरी इतकेच आहे.

हेही वाचा >>> चित्रनगरीतील कचऱ्याची जबाबदारी कोणाची ? महापालिका आणि फिल्मसिटी प्रशासनामध्ये समन्वय बैठक होणार

उत्तरेत थंडी लाट आल्यामुळे आणि पश्चिमी झंझावात सक्रीय राहण्याची शक्यता असल्यामुळे बुधवारपर्यंत (१८ डिसेंबर) थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान नऊ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे, अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हेही वाचा >>> तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू

जळगावात पारा आठ अंशांवर

राज्यात मंगळवारी जळगावात ८.० अंश सेल्सिअस इतक्या सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल नाशिक ९.४, नगर ११.७, पुणे १२.३, महाबळेश्वर १३.२, छत्रपती संभाजीनगर १२.२, परभणी १२.५, अकोला ११.८, अमरावती १२.३, बुलढाणा ११.४, नागपूर १२.०, वर्धा १२.४, कुलाबा २०.८, सातांक्रुज १८.० आणि डहाणूत १४.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minimum temperatures likely to drop in north and central maharashtra mumbai print news zws