गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता असलेले  सिडकोच्या साडेबारा टक्के योजना वितरण विभागातील लिपिक अतुल म्हात्रे यांची हत्या झाल्याचे रविवारी उघड झाले. नेरुळ येथील संध्या सिंग हत्या प्रकरण अद्याप ताजे असतानाच नवी मुंबईत घडलेल्या या प्रकाराने येथे खळबळ उडाली आहे. जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. म्हात्रे शुक्रवारी सिडको मुख्यालयातील आपले काम आटोपून स्वत:च्या कारने घराकडे निघाले होते, पण ते रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी पनवेल पोलीस ठाण्यात म्हात्रे बेपत्ता झाल्याची तक्रार केली. पोलीस म्हात्रे यांचा शोध घेत असतानाच पनवेल तालुक्यातील माणघर गावातील एका झुडपात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर चाकूचे ३५ वार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.