मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाशी संबंधित तीन कंत्राटदारांची चौकशी केली आहे. मागील २० वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी विशेष तपास पथकाने कैलाश कन्स्ट्रक्शनचे मनिष काशिवाल, अॅक्यूट एंटरप्रायजेसचे ऋषभ जैन आणि मंदीप एंटरप्रायजेसचे शेर सिंह राठोड या कंत्राटदारांना समन्स बजावण्यात आले होते. गेल्या आठड्याभरापासून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सहपोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त आणि पोलीस निरीक्षक विशेष तपास पथकात सहभागी आहेत. ते २००५ ते २०२१ पर्यंत सर्व कंत्राटाची तपासणी करत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विधान परिषदेत या प्रकरणी चौकशीची घोषणा करण्यात आली होती. भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांनी ही मागणी केली होती.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाला लक्ष्य करण्यासाठी हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका व एमएमआरडीएशी संपर्क साधला असून कंत्राटाच्या तपशिलांची मागणी केली आहे. नदीच्या उगमस्थळापासून पवई ते कुर्ला या ११ किमी ८४० मीटरच्या सफाईची जबाबदारी महापालिका व उर्वरित ६ किमी ८०० मीटरची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे.
सहा विशेष तपास पथके स्थापन
गेल्या आठवड्याभरापासून याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यात एकूण १८ कंत्राटदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सहा विशेष पथकांची नियुक्ती महापालिकेतील कंत्राटांमधील कथित अनियमिततेबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत सहा विशेष तपास पथके स्थापन केली आहेत. त्यात खिचडी गैरव्यवहार, करोना काळात मृतदेहांना ठेवण्यासाठी पिशव्या खरेदी, प्राणवायू प्रकल्प अशा विविध प्रकरणांची यापूर्वीच चौकशी सुरू झाली आहे. त्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्यात मिठी नदीच्या स्वच्छतेच्या प्रकरणाची भर पडली आहे.