छगन भुजबळ, अजित पवार आणि सुनील तटकरे या पहिल्या फळीतील नेत्यांवर चौकशीची टांगती तलवार असतानाच अण्णा भाऊ साठे महामंडळात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी आमदार रमेश कदम यांना झालेल्या अटकेने राष्ट्रवादीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अटक करण्यात आलेले कदम हे पहिलेच नेते ठरले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. सिंचन घोटाळ्यात अजित पवार आणि सुनील तटकरे यांची चौकशी सुरू आहे. घोटाळ्यांचे आरोप चिकटल्याने राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर तर परिणाम झालाच, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसला होता. पहिल्या फळीतील नेत्यांच्या चौकशीमुळे राष्ट्रवादीची आधीच पंचाईत झाली आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद भूषविताना कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरून सोलापूर जिल्ह्य़ातील मोहोळचे आमदार रमेश कदम यांना सोमवारी अटक करण्यात आली.
कदम कायम वादग्रस्त
आमदार कदम हे कायम वादग्रस्त राहिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना एका प्रकरणात अडकविण्यात त्यांचाच हात असल्याची चर्चा होती. ढोबळे यांचा पत्ता कापून कदम यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि ते निवडून आले. मंडळाचे अध्यक्ष असताना कोटय़वधी रुपयांचा निधी स्वत: पदाधिकारी असलेल्या संस्थांकडे वळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
कदम यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
राज्य सरकार संचालित अण्णाभाऊ साठे विकास प्राधिकरणात (एएसडीसी) १५० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रमेश कदन यांना गुन्हे विभागाने पुणे येथून अटक केली. त्यांना पोलीस कोठडीसाठी मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कदम यांच्यावर याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा