मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मोसमी पाऊस यंदा अपेक्षित वेळेत परतला आहे. मोसमी पावसाने मंगळवारी (१५ ऑक्टोबर) देशातून पूर्णपणे माघार घेतली असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. यंदा दरवर्षीपेक्षा एक दिवस आधी, ३० मे रोजी केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला होता.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नियोजित वेळेपेक्षा सात दिवस उशिरा २३ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास दक्षिण राजस्थान आणि गुजरातच्या कच्छमधून सुरू झाला. दोन ऑक्टोबरपर्यंत गुजरात, राजस्थानच्या बहुतांश भागासह लेह, लडाख, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाना, दिल्ली, हिमाचल प्रदेशातून मोसमी पाऊस माघारी फिरला होता. पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातून परतीचा प्रवास सुरू झाला होता. ईशान्य भारतासह उत्तराखंड, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंडच्या काही भागातून १३ ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस माघारी परतला तर मंगळवारी (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मोसमी पाऊस परतला आहे. यंदा दरवर्षी सहा दिवस अगोदरच दोन जुलै रोजी मोसमी वाऱ्यांनी सर्व देश व्यापला होता.

परतीचा प्रवास (कंसात नियोजित वेळ)

२३ सप्टेंबर – दक्षिण राज्यस्थान, कच्छमधून परतीचा प्रवास सुरू (१७ सप्टेंबर)

५ ऑक्टोबर – महाराष्ट्रातून (नंदूरबार) परतीचा प्रवास सुरू (५ ऑक्टोबर)

१५ ऑक्टोबर – संपूर्ण देशातून माघार (१५ ऑक्टोबर)

परतीच्या पावसाची गरज का?

राज्यात सामान्यपणे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात मोसमी पाऊस हजेरी लावतो. असे झाले तर मोसमी पावसाचे वर्तन नैसर्गिक व सुयोग्य समजले जाते. असे झाल्यास परतीचा पाऊस, मार्चच्या मध्यापर्यंत थंडी, बंगालच्या उपसागरात अधिक व अरबी समुद्रात कमी संख्येने होणारी चक्रीवादळे, कमी गारपीट व माफक धुके, थंडीतील भू-दवीकरण व भू-स्फटिकिकरण, असे सुयोग्य वातावरणीय बदल निसर्ग चक्रानुसार घडतात. जे शेतीसाठी उपयोगी ठरतात, अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हेही वाचा – पथकराच्या खर्चातून एसटीची सुटका : मुंबईतील पाच टोल नाक्यावरील पथकरातून एसटीला वगळले

किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजबंगालच्या उपसागरात दक्षिण भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होऊन, ते तमिळनाडू किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मुसळधार ते खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने पुढील तीन दिवस किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हेही वाचा – स्थगिती नसल्यानेच सात आमदारांच्या नियुक्त्या, राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका

मुंबईत यंदा मोसमी पावसाचा अधिक मुक्काम

सर्वसाधारणपणे मुंबईतील मोसमी पाऊस ३० सप्टेंबरपर्यंत असतो. परंतु या वर्षी काही दिवस वगळता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांना पावसाने झोडपले. मुंबईत मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास साधारणपणे ८ ऑक्टोबरपासून सुरू होतो. यंदा मुंबईतील मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास एक आठवडा उशीरा झाला आहे. मागील काही वर्षे पावसाच्या वेळापत्रकात सातत्याने बदल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत २०२३ मध्ये मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास वेळेपूर्वी म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला होता. २०२२ मध्ये २३ ऑक्टोबरला, तर,२०२१ मध्ये १४ ऑक्टोबरला मोसमी वारे परतले. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या नोंदीनुसार २०२० मध्ये सर्वात उशीरा म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.मोसमी पावसाच्या हंगामात म्हणजेच १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सरासरी २०९४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा या कालावधीत कुलाबा केंद्रात ५४६.५ मिमी अधिक म्हणजे सरासरी २६४१ मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ २३१८.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा ७७० मिमि अधिक म्हणजेच ३०८९ मिमी इतका पाऊस झाला आहे.