लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई : मुंबईमध्ये चिकनगुन्याची साथ आटोक्यात आली आहे. मात्र राज्याच्या तुलनेत मुंबईत ३१ ऑगस्टपर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात नोंदवलेल्या रुग्णांच्या तुलनेत मुंबईतील रुग्णांची संख्या जवळपास २५ टक्के इतकी आहे. मुंबईमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे चिकनगुन्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबईमध्ये अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे सखलभागांमध्ये पाणी साचते. साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याने चिकनगुन्याची साथ पसरत आहे. राज्यामध्ये १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत चिकनगुन्याचे ५२१ रुग्ण सापडले आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे जवळपास २५ टक्के रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईमध्ये १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत १३१ रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईमध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये ६९ रुग्ण सापडले आहेत. यंदा मुंबईपाठोपाठ पुण्यात चिकनगुन्याचे ६१ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, २०१६ नंतर यंदा प्रथमच चिकनगुन्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. चिकनगुन्याच्या ७३ रूग्णांची नोंद २०१६ मध्ये झाली होती. चिकनगुन्या झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, अंगदुखी, सतत सांधेदुखी आणि त्वचेवर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. आणखी वाचा-मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहात पुस्तकांची विक्री मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत असल्याने चिकनगुन्याचा प्रसार करणाऱ्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे चिकनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. चिकनगुन्याचा ताप घातक नसला तरी त्याच्या तीव्र लक्षणांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होतो. अनेकांना याचा त्रास सहा महिन्यांपर्यंत होतो. त्यामुळे त्यांना वेदना सहन कराव्या लागतात. आतापर्यंत चिकनगुन्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. बहुसंख्य रुग्ण लक्षणात्मक उपचाराने बरे होतात, असे एका डॉक्टरांनी सांगितले.