School Bus Accident in Mumbai : शालेय विद्यार्थ्यांचा सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास व्हावा म्हणून पालक त्यांना शाळेच्या बसने शाळेत पाठवतात. परंतु, शाळेच्या बसही असुरक्षित असल्याचं सातत्याने समोर येत आहे. शाळेच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी कोंबणे, मर्यादेच्या बाहेर जाऊन वेगाने वाहन चालवणे अशा विविध कारणांमुळे शाळेच्या बसचा अपघात होतो. परिणामी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो. असाच प्रकार मुंबईच्या जेजे उड्डाणपुलावर घडला आहे.

बुधवारी २६ जून रोजी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस जे जे. उड्डाणपुलाच्या बाजूच्या भिंतीला धडकली. यावेळी बसमध्ये जवळपास २० शाळकरी विद्यार्थी होती. या अपघातात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. इरफान या १२ वर्षीय जखमी मुलाला उपचारांसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी बस चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरेटक करण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी लालू कुमार संतू (२४ वर्षे) या बस चालकाला अटक केली.

हेही वाचा >> पदपथांना फेरीवाल्यांचा वेढा, बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची कसरत

दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील मुलांना वाचवण्यासाठी बेस्टचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर या बसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जे. जे उड्डाणपुलावर झालेल्या अपघातानंतर बसचा व्हिडिओ जवळच्या इमारतीत राहणाऱ्या कोणीतरी शूट केला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक स्कूल बसचे अपघात होत आहेत. पालकांचा त्रास वाचावा म्हणून पालक त्यांच्या पाल्यांना स्कूल बसच्या सुविधेचा वापर करतात. परंतु, अकुशल, बेजाबदार, असभ्य वर्तन असलेले या बसचे चालक असतात. परिणामी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो. अनेकदा बसच सदोष असतात. वाहनांची नियमित तपासणी न केल्यानेही अपघात होतात. त्यामुळे मुलांना स्कूल बसने सोडताना बस आणि बसचालकाची चौकशी करणे पालकांना गरजेचं आहे.