मुंबई : मागील काही दिवस शहर आणि उपनगरांत पडलेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकात सुधारणा झाली होती. गेले अनेक दिवस मुंबईतील हवेची ‘चांगल्या’ श्रेणीत नोंद झाली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास मुंबईचा हवा निर्देशांक १३१ इतका म्हणजेच ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला गेला.

‘समीर’ ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारी मुंबईतील भायखळा, माझगाव येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत होती. शुक्रवारी सायंकाळी भायखळा येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २४३, तर माझगाव येथील २१३ इतका होता. तसेच वरळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, वांद्रे – कुर्ला संकुल, आणि बोरिवली येथील हवा निर्देशांक अनुक्रमे १२७, ११४, १२१, १६६ आणि ११६ इतका होता. या सर्व केंद्रावर हवेचा स्तर ‘मध्यम’ होता. गेले काही दिवस मुंबईतील सर्व भागातील हवा गुणवत्ता ‘चांगली’ या श्रेणीत नोंदली जात होती. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मुंबईकरांना प्रदूषणविरहीत हवा अनुभवता येत होती. मात्र आता पुन्हा हवा गुणवत्ता खालावल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे ‘चांगले’, ५१-१०० मधील ‘समाधानकारक’, १०१-२०० दरम्यान ‘मध्यम’, २०१-३०० ‘वाईट’, ३०१-४०० दरम्यान ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे ‘अतिधोकादायक’ समजली जाते.

हेही वाचा – हुंड्यासाठी पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप, पती अटकेत

हेही वाचा – म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : लवकरच विजेत्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, विजेत्यांना सोमवारपासून तात्पुरते देकारपत्र

दरम्यान, पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.