मुंबई :  मुंबईतील हवेचा निर्देशांक मंगळवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला असून वांद्रे – कुर्ला संकुल, तसेच शिवाजी नगर येथे ‘खराब’ हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता सोमवारीही मध्यम श्रेणीत होती. ‘समीर’ ॲपनुसार मंगळवारी सकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ११४ वर पोहोचला होता.

मुंबईत सध्या आर्द्रता असल्याने सकाळी प्रदूषके साचून राहतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, मंगळवारी सकाळी वांद्रे – कुर्ला संकुल येथील हवा निर्देशांक २०२, तर शिवाजी नगर येथील २७१ इतका होता. तसेच शिवडीमध्ये १९६, वरळी १४१, चेंबूर १०८, भायखळा १२४, कुलाबा १०५ , देवनार येथे १४८ हवा निर्देशांक होता.

हेही वाचा >>> वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा, मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

दरम्यान, सोमवारी सायंकाळी हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते. भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Mumbai Local Train Update : दिवा-कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप

दरम्यान ,पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.

हवेचा दर्जा ढासाळल्याने काळजी काय घ्यावी ? प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद््भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.