मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेता येणार नाही किंवा मोबाइल नेलाच तर तो मतदान केंद्राबाहेर ठेवण्याची जबाबदारी मतदारांवरच असणार आहे, असे मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि मुंबईचे निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधताना स्पष्ट केले.

विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून मुंबईतील निवडणुकीसाठी भूषण गगराणी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून आधीच नेमणूक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गगराणी यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा भाग म्हणून मुंबईतील सर्व राजकीय अनधिकृत फलक, बॅनर, पोस्टर, स्टिकर काढण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. परवानगी असलेल्या ठिकाणी विहित पद्धतीने परवानगी घेतल्यानंतरच राजकीय पक्षांनी बॅनर्स, पोस्टर्स लावावे, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मुंबई : घरात घुसून महागड्या वस्तू चोरी करणाऱ्या महिलेला अटक

‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ या अभियानाविषयी माहिती देताना गगराणी म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर मतदान केंद्रांमध्ये वाढ आणि बदल झालेल्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक कुटुंब आणि मतदारांपर्यंत पोहोचून मतदान केंद्रांची लेखी स्वरूपात माहिती देत आहेत. त्यासाठी ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ अर्थात ‘Know Your Polling Station’ ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात येत आहे. राजकीय पक्षांनीही आपापल्या स्तरावर याबाबत खात्री करावी, असे आवाहन गगराणी यांनी केले.

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या व त्यांची गैरसोय झाली. त्यामुळे यावेळी मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करतानाच, प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे इत्यादी किमान सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांची गैरसोय होवू नये, याची विशेषत्वाने काळजी घेण्यात येत आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा – अनिल देसाईंची खासदारकी निर्भेळ, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबईत एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही

निवडणुकीच्या आधी जिल्हाधिकारी आणि पोलिस विभाग सर्वेक्षण करून संवेदनशील विभाग निश्चित करीत असतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबईत एकही संवेदनशील मतदान केंद्र नव्हते, अशी माहिती यावेळी सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा असेच सर्वेक्षण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मतदान नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस

अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या पात्र मतदारांना १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नाव नोंदणी करता येईल. त्याचप्रमाणे नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे याबाबतही समान प्रक्रिया आणि मुदत आहे, अशी माहिती देखील गगराणी यांनी दिली.