मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या वादग्रस्त कार्यक्रमाचे सर्व १८ भाग हटवण्याबाबत युट्यूबला महाराष्ट्र सायबर विभागाने पत्र लिहिले आहे. तसेच, यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनीही अश्लील टीका टिप्पणी केली असल्यास त्यांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचेही सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. याप्रकणात तन्मय भट, राखी सावंत, उर्फी जावेद, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि दीपक कलाल सह इतर सहभागी झालेल्या व्यक्तींना समन्स बजावले आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाने रैना, रणवीर सह ३० ते ४० जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या रणवीरच्या उपस्थितीत असलेल्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना यात आरोपी करत त्यांना समन्स बजाविण्यात येत आहे. लवकर या सर्वांना चौकशीसाठी (पान ८ वर) (पान १ वरून) बोलाविण्यात येणार असल्याचे सायबर विभागाने सांगितले. याप्रकरणी आसाम पोलिसांनी पहिला गुन्हा नोंदवला आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी बुधवारी आसाम पोलीस मुंबईत दाखल झाले. त्यांनी, मुंबई पोलिसांकडे तपासासंबंधित चर्चा केली. तसेच काही जणांचे जबाबही घेण्यास सुरुवात केल्याचे समजते आहे. दरम्यान अपुर्वा मखिजासह अलाहबादिच्या व्यवस्थापकाचाही जबाब नोंदवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
इंडियाज गॉट लेटेंटचे एकूण १८ भाग युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. हे सर्व भाग हटविण्याबाबत युट्यूबला पत्र पाठविण्यात आल्याचे सायबर विभागाने सांगितले. प्रेक्षकांना यात साक्षीदार केले जाणार असल्याचेही सायबर विभागाने सांगितले. समय रैना याच्या या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना परीक्षक म्हणून बोलावण्यात येते. एका भागामध्ये यूट्युबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांना बोलावण्यात आले होते. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई-वडिलांबाबत अश्लील प्रश्न विचारत आक्षेपार्ह विधाने केली होती. याप्रकरणी खार पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे.
‘तपास संस्थांना सहकार्य’
जे काही घडत आहे ते माझ्यासाठी खूप जास्त आहे. मी माझ्या चॅनेलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि मजा करणे हा माझा एकमेव उद्देश होता. त्यांच्या चौकशी निष्पक्षपणे पूर्ण व्हाव्यात. यासाठी मी तपास संस्थांना योग्य ते सहकार्य करेन, असे समय रैनाने सांगितले आहे.