मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रथमच मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आआयटी) गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी होत असतानाच भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणीचे काम सुरू करावे. ‘आयआयटी’ ने गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मुंबईतील सर्व रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर अशा एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (थर्ड पार्टी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात नुकताच सामंजस्य करारही करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील १ पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व अनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत केली जाणार आहेत. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे, १ ऑक्टोबरपासून रस्ते विकास कामे सुरू झाली आहेत.

हेही वाचा – Mumbai Local Train : ठाकुर्लीजवळ ओव्हरहेडमधील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत; एक तासाहून अधिक काळ लोकल खोळंबल्या, प्रवाशांचा संताप

भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी रस्ते व वाहतूक विभागातील प्रमुख अधिकारी, अभियंते यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात घेतली. भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी आयआयटीच्या प्रतिनिधींनी प्रमाणित कार्यपद्धतीचे सादरीकरण केले. रस्ते कामांची पूर्वतयारी १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू झाली आहे. टप्पा क्रमांक १ मधील उर्वरित कामे, टप्पा २ मधील नव्याने सुरू होणारी कामे करताना प्राधान्यक्रम निश्चित केल्यापासून कामाची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महानगरपालिका अभियंते व आयआयटी पथक (टीम) यांच्यात सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे. आयआयटी पथक व रस्ते विभागामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने समन्वय राखण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – मुंबई : नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली

आयआयटीचे प्रा. के. व्ही. के. राव यांनी कामकाजाची दिशा कशी असेल हे सर्वप्रथम स्पष्ट केले व त्यासाठी रस्ते विभागाने आवश्यक माहिती पुरविणे, प्राधान्यक्रमांची यादी पुरविणे, कामे सुरू असताना सामग्री (मटेरियल) बनविण्याचा कारखाना ते प्रत्यक्ष कार्यस्थळ या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या, आयआयटी पथकाच्या नियोजित भेटी यासाठी परिवहन सहाय्य तसेच आयआयटी पथकाला कार्यस्थळी विनासायास प्रवेश मिळावा यासाठीची सुलभता अशा विविध बाबींबाबत रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. आयआयटी आणि रस्ते विभाग यांच्यातील समन्वयासाठी समन्वय (नोडल) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.