मुंबईः माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले असताना या वर्षभरात मुंबईत राजकीय हत्या अथवा गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. त्यात अभिनेता सलमान खानच्या घरावरील हल्ला, घोडपदेव येथील राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाची हत्या, यांचाही समावेश आहे. मुंबईत गेल्या ९ वर्षांत १९ गोळीबाराच्या घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

नुकतीच ५ ऑक्टोबरला घोडपदेव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी ऊर्फ मुन्ना (४५) यांची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण आता गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे. आरोपी सराईत असून यापूर्वीही त्यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, धमकावणे, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचा – Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट तुरुंगात रचला! रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या आणि.. आत्तापर्यंत काय काय घडलं?

यावर्षी सर्वात चर्चेचा विषय ठरलेली घटना म्हणजे सलमान खानच्या घरावर गोळीबाराची. १४ एप्रिल रोजी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. त्याप्रकरणी कुख्यात लॉरेन्स बिष्णोईसह त्याचा भाऊ अनमोल बिष्णोईसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गोळीबार करणारे विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुजरातमधून अटक केली होती. त्यांना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाषचंदर बिष्णोई (३७) व अनुज थापन (३२) यांना पंजाब येथून अटक करण्यात आली होती. याप्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली होती. त्याशिवाय टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई व त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.

हेही वाचा – बिष्णोई टोळी महाराष्ट्रात कशी पसरते आहे ? महाराष्ट्रात पसरण्यासाठी बिष्णोई टोळीला समाजमाध्यमांचा आधार

याशिवाय ७ एप्रिलला आर्थिक वादामुळे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत विजय शेट्टीयार नावाच्या आरोपीने अ‍ॅन्टॉप हिल परिसरात आकाश कदमवर गोळीबार केला. शेट्टीयारला नंतर डोंबिवलीतून अटक करण्यात आली. तसेच २ फेब्रुवारीला बोरीवली परिसरात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर व मॉरिस यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होती. पण नुकतीच दोघांनीही एकमेकांविरोधातले वाद मिटवून सलोखा केला होता. त्यामुळे मॉरिसने अभिषेक घोसाळकरला साडी वितरण कार्यक्रमाला त्याच्या कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी केबिनमध्ये गेल्यानंतर फेसबुक लाईव्ह करून मॉरिसने गोळ्या झाडल्या. मॉरिसने त्याच्याकडील रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या. त्यानंतर मॉरिसने स्वतःवरही गोळी झाडली होती.