गाडय़ांची काच फोडून दार उघडत गाडीतील ऐवज चोरणाऱ्या टोळीला गावदेवी पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडण्याची कामगिरी केली आहे.
दक्षिण मुंबईतील चौपाटीजवळील सुखसागर हॉटेलच्या आसपास उभ्या केलेल्या गाडय़ातील ऐवज चोरीला गेल्याच्या तक्रारी गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. चोऱ्या या रात्री साडेसात ते दहा वाजण्याच्याच दरम्यान झाल्याने पोलीसही संभ्रमात पडले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताजी भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्यामराव पाटील यांनी माहिती घेतली असता, एकच टोळी या चोऱ्या करीत असल्याचे लक्षात आले. त्यातही टोळी एका गाडीतूनच येऊन झटपट पळून जात असल्याचेही लक्षात आले. हे पाहून पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचण्याचे ठरविले.
पोलिसांनी हॉटेलजवळ गाडी उभी करीत त्यात एक लॅपटॉप बॅग ठेवली. रात्र झाल्यावर एक टॅक्सी संशयितपणे आणि अगदी धिम्या गतीने हॉटेल परिसरात येताना पोलिसांना दिसली. त्याच वेळी एक व्यक्ती उभ्या केलेल्या त्या गाडीजवळ आला.
त्याने आपली टोपी काढली आणि परत डोक्यावर ठेवली. हाच प्रकार त्याने एक-दोनदा केला. गाडीतच बसलेल्या चोरटय़ांनी गाडीची काच फोडून दरवाजा उघडला आणि गाडीतील लॅपटॉप बॅग उचलली. त्यावेळी पोलिसांनी पुढे सरसावत चोरटय़ांना थांबण्यास सांगितले. आपण पकडले जाणार हे लक्षात आल्यावर चोरटय़ांनी गाडी पळविण्यास सुरुवात केली.
पोलिसांनीही गाडय़ा काढत त्यांचा पाठलाग सुरू केला. ऐन वाहतूक कोंडीत सुसाट गाडी चालवणाऱ्या या चोरटय़ांचा पाठलाग करणे पोलिसांना अवघड होऊ लागले. त्यांनी दोन दुचाकीस्वारांना मदतीला घेऊन पाठलाग केला आणि ऑगस्ट क्रांती मैदान येथे या चोरटय़ांना अडवले. गणेश पवार आणि संतोष काळे यांना पोलिसांनी अटक केले तर टॅक्सीचालक पळून गेला.
पोलिसांच्या चौकशीत गणेश पवार हा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. गणेश कारमधील टेप, बॅग, जे असेल ते घेऊन पळ काढत असे, गाडीतूनच येऊन ज्या गाडीतील ऐवज चोरायचा आहे, त्याच्या बाजूला गाडी उभी केल्याने पादचाऱ्यांनाही कुठलाच संशय येत नसे, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. त्याच्यावर आतापर्यंत ४२ गुन्हे दाखल असून घरफोडय़ा, चोऱ्या यात त्याचा हातखंडा असल्याचेही स्पष्ट झाले. हवालदार सुनील कदम, संग्राम अतिग्रे, प्रमोद वाडते यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. चोरटय़ांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

शक्ती मिल भूखंडाचे भवितव्य जून महिन्यात ठरणार
विशेष प्रतिनिधी, मुंबई<br /> महिला वृत्तपत्र छायाचित्रकारावरील बलात्काराने चर्चेत आलेल्या महालक्ष्मी येथील सुमारे साडेसहा एकर इतका शक्ती मिलचा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली होती. परंतु न्यायालयीन स्थगिती असल्यामुळे भूखंड ताब्यात घेण्याबाबतची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आता एकल न्यायाधीशापुढे जून महिन्यात सुनावणी होणार आहे.
शक्ती मिलचा मोक्याचा भूखंड ताब्यात घ्यावा, व त्यावर सामान्यांसाठी परवडणारी घरे बांधण्यासाठी वापरावा, असा आदेश माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला होता. शक्तीमिल व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याबाबत शासनाला प्रतिज्ञापत्रही सादर करण्यास सांगितले होते. परंतु त्यास विलंब लावल्यामुळे न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही बाब ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यानंतर विद्यमान महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्याची दखल घेत प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत पुढाकार घेतला होता. हा भूखंड कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून ताब्यात घेतला जाईल, असेही खडसे यांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणी सतत पाठपुरावा करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ते जयेश कोटक यांच्यामुळे एका अवर सचिवालाही बदलीला सामोरे जावे लागले होते.
विशेष म्हणजे या भूखंडाचा कागदोपत्री ताबा शहर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. इतकेच नव्हे तर मिळकत पत्रिकेतून शक्ती मिल्सचे नावही कमी करण्यात आले आहे.
लाचखोर अभियंता सापळ्यात
प्रतिनिधी, मुंबई
विजेच्या मीटर शिफ्टिंग करण्यासाठी लाच मागणाऱ्या विद्युत पूरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या उपअभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले. कार्यालयातूनच पळ काढणाऱ्या प्रभारी अभियंत्याचा शोध घेण्यात आहेत.
काळाचौकी येथील मेहता मेन्शन या इमारतीच्या वायिरगला आग लागून तिचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या वेळी स्थानिक रहिवाशांनी विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या नियंत्रण कक्षाला कळविले. त्या वेळी विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमातील उपअभियंता हनुमंत दहिफळे (३६) आणि प्रभारी अभियंता संजय शिंदे (४७) यांनी इमारतीला भेट देऊन १६ मीटर तत्काळ सुरू केले. तसेच उर्वरित मीटरचे काम वायरमनकडून करून घेण्यास सांगितले. त्या वेळी रहिवाशांच्या विनंतीवरून दोन्ही अधिकाऱ्यांनी काम करण्याची तयारी दाखवली. त्यासाठी दोघांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्या वेळी रहिवाशांनी दहिफळे यांना २ हजार रुपये दिले. त्यानंतर हे काम पूर्ण झाल्यानंतर २५ एप्रिलला वायरिंगचे प्रमाणपत्र तसेच मीटर शिफ्टिंग करण्याबाबत अर्ज देण्याकरिता काही रहिवासी विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या एफ/दक्षिण कार्यालयात गेले. त्यावेळी दहिफळे आणि शिंदे यांनी उर्वरित रकमेची मागणी केली. अखेर रहिवाशांनी याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानुसार एफ/दक्षिण प्रभा कार्यालयात लावण्यात आलेल्या सापळ्यात शिंदे याने तीन हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. कारवाईची माहिती मिळताच दहिफळे कार्यालयातून फरार झाले.

 

रस्ते अपघातात महिलेचा मृत्यू
प्रतिनिधी, मुंबई
महाविद्यालयातून घरी परतताना आईला सोबत नेणाऱ्या मुलाला रस्ते अपघातात आईला गमावण्याची धक्कादायक घटना कुरार येथे मंगळवारी रात्री घडली. भरधाव वेगाने मागून आलेल्या स्कूटीने धक्का दिल्याने सुहासिनी वजीरकर (५५) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पश्चिम द्रुतगती मार्ग येथे घडली. धावत्या गाडीवरून डोक्यालाच मार लागल्याने सुहासिनी यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना गोरेगावच्या रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. कुरार पोलीस स्कूटीचालकाला शोधत आहेत.
गोरेगाव (पू.) येथील न्यू म्हाडा कॉलनी येथे राहणारा सिद्धेश वजीरकर बोरिवली येथील एका महाविद्यालयात शिकतो. महाविद्यालयातून घरी जाताना आपल्या आईला मोटारसायकलवरून कधीकधी घरी नेत असे. मंगळवारी सायंकाळीही तो आईला भेटला आणि दोघे घरी निघाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात असताना ओमकार गेटसमोर आले असता मागून आलेल्या काळ्या रंगाच्या एका स्कूटीने वजीरकर यांच्या गाडीला धडक दिली. धडकेने मागे बसलेल्या सुहासिनी यांचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर पडल्या, त्यांच्या डोक्याला मागच्या बाजूस जखमा झाल्या. सिद्धार्थने तातडीने त्यांना गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात आईला नेले, परंतु दाखल करताक्षणीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार एक काळ्या रंगाच्या स्कूटीमुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत असून त्या अज्ञात स्कूटीचालकाचा शोध घेत असल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिंबण्णा व्हनमाने यांनी दिली.