मुंबईः मालाड पूर्व येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या मनसे कार्यकर्त्याच्या हत्ये प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. त्यातील काही आरोपींविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना शनिवारी संध्याकाळी मालाड पूर्वे येथे रेल्वे स्टेशनजवळ घडली होती. आकाश माईन (वय २७ वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्याचे नाव होते. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आकाश १३ ऑक्टोबर रोजी मालाड पूर्व शिवाजी चौक येथून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पुढे जाणाऱ्या रिक्षा चालकाने रिक्षा अचानक वळवल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्याचे एका रिक्षावाल्याशी भांडण झाले. वाद वाढल्यानंतर रिक्षा चालकाचे मित्र, स्थानिक फेरीवाले तेथे जमले. जमलेल्या सुमारे १० ते १५ जणांनी मनसे कार्यकर्ता आकाश याच्यावर हल्ला केला. लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आकाश माईनचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशच्या पायाला, हाताला, पोटावर व कंबरेला मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा – Lawrence Bishnoi : मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची कोठडी का मिळत नाही? कारण आलं समोर

हेही वाचा – Uddhav Thackeray hospitalized : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

आकाश यांची पत्नी अनुश्री माईन यांच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने अविनाश नामदेव कदम, अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दिपक आमटे, राकेश मलकु ढवळे, साहिल सिकंदर कदम यांना अटक केली आहे. अविनाश कदम विरोधात यापूर्वी पंतनगर व बोरीवली पोलीस ठाण्यात मारामारी व अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आदित्य सिंह व जयप्रकाश आमटे विरोधात २०१९ मध्ये दिंडोशी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी दगडाने मारहाण करून एकाचा खून केला होता. पोलिसांनी हत्येत वापरलेला दगडही जप्त केला होता. याप्रकरणात आरोपी वैभव सावंत व इतर व्यक्तींचाही सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. दरम्यान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आकाशवरील हल्ल्याबाबत ट्वीट करून मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.