मुंबईतल्या गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या आगीत जखमी झालेल्या नागरिकांवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील, असंही राज्य सरकारने जाहीर केलं आहे. या दुर्घटनेप्रकरणी सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त करतो.
या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त वेळोवेळी माहिती घेत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी, तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हे ही वाचा >> डीनला संडास साफ करायला लावण्याच्या घटनेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “मस्तवाल, गद्दार खासदाराने…”
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “गोरेगावमध्ये एसआरएची जय भवानी इमारत आहे. त्या इमारतीत आग लागली आहे. मी सातत्याने महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहे. मी त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असं प्राथमिक स्तरावर निदर्शनास आलं आहे.”