मुंबई : मागील आठवड्यात मुंबईकरांना मिळालेल्या किंचितशा तापमान दिलाशाला पूर्णविराम मिळाला असून मुंबईकरांना सोमवारी संपूर्ण दिवस उष्ण झळांचा सामना करावा लागला. कोरड्या वाऱ्यांमुळे दुपारी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अक्षरश: भाजून निघाल्याची जाणीव होत होती.
मुंबईमध्ये सोमवारी मागील काही दिवसांच्या तुलनेत तापमानात किंचित वाढ झाली . हवामान विभागच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३२.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी काही अंशानी तापमानात वाढ झाली. तापमान कमी नोंदले गेले असले तरी, कोरड्या, उष्ण वाऱ्यांनी ही जाणीव अधिक त्रासदायक झाली. आर्द्रतेमुळे येणारा घाम परवडला, पण कोरड्या हवेमध्ये भाजून निघाल्याची जाणीव असह्य असल्याची भावना मुबंईकरांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कालावधीत किमान तापमानाचा पारा २४ ते २६ अंशापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सकाळच्या वेळीही अस्वस्थता जाणवू शकते. तर, कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशापर्यंत असेल. या कालावधीत आकाश निरभ्र असू शकेल. त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप होऊ शकेल.
दरम्यान, मागील आठवड्यात मुंबईतील तापमानात सलग चार ते पाच दिवस घट झाली होती. यामुळे मुंबईकरांना तापमान दिलासा मिळाला होता. मात्र, उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झालेली नाही. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस मुंबईकरांना हा उकाडा सहन करावा लागणार आहे.
मागील आठवड्यातील तापमान
१६ मार्च- ३४.२ अंश सेल्सिअस
१५ मार्च- ३५.१ अंश सेल्सिअस
१४ मार्च- ३४.५ अंश सेल्सिअस
१३ मार्च- ३४.९ अंश सेल्सिअस
१२ मार्च- ३८.६ अंश सेल्सिअस
११ मार्च- ३९.२ अंश सेल्सिअस
१० मार्च- ३७.२ अंश सेल्सिअस
सोलापूर सर्वाधिक उष्ण
सोलापूर येथे सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद सोमवारी झाली. तेथे ३९.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. काही दिवसांपूर्वी या परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. यापूर्वीही सोलापूर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज
राज्यभरात उन्हाचा तडाखा कायम आहे. तसेच काही भागात ढगाळ वातावरण असेल. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.