मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झालेले असले तरी या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सातही धरणांतील पाणीसाठा १८ टक्क्यांवर गेला आहे. पवई परिसरात सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे मुंबईच्या हद्दीतील तुळशी आणि विहार या जलाशयातील पाणीसाठी चांगलाच वाढला आहे.
पावसाने ओढ दिल्यामुळे सातत्याने खालावलेला धरणातील पाणीसाठा गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे वाढू लागला आहे. त्यातच रविवारी पडलेल्या पावसाने भर घातली आहे. त्यामुळे साडेपाच टक्क्यांपर्यंत गेलेला पाणीसाठा आज (८ जुलै) १८.७३ टक्के झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धरणातील पाणीसाठी वेगाने कमी होत होता. त्यात आता वाढ होऊ लागली आहे. सोमवारी ८ जुलै रोजी सातही धरणांत मिळून दोन लाख दशलक्ष लीटरहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. अद्याप धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत नसला तरी काल रात्रीपासूनच्या पावसाने थोडासा दिलासा दिला आहे.
हेही वाचा – “वडील सापडतात, मग मुलगा का नाही?” वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतील पाणीसाठा वाढत असला तरी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्षलीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत २ लाख ७१ हजार १४७ दशलक्षलीटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा ७१ हजार दशलक्षलीटरपर्यंत खालावला होता.
धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये वाढ होईपर्यंत पाणी कपात लागू राहणार आहे.
विहार आणि तुळशी तलावात मोठा पाऊस
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी विहार आणि तुळशी तलाव हे दोन तलाव मुंबईच्या हद्दीतच आहेत. या तलावांपैकी विहार तलावात रविवारी दिवसभरात ३६४ मिमी पावसाची नोंद झाली तर तुळशी तलावात २५४ मिमी पावसाची नोंद झाली.
८ जुलै २०२४ – २ हजार ७१ दशलक्ष १४७ लीटर – १८.७३ टक्के
८ जुलै २०२३ – ३ लाख १२ हजार २५१ दशलक्षलीटर – २१.५७ टक्के
८ जुलै २०२२ – ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्षलीटर – २५.९४ टक्के
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
उर्ध्व वैतरणा – ००
मोडक सागर – ३५.८५ टक्के
तानसा – ४०.६९ टक्के
मध्य वैतरणा – १९.५१ टक्के
भातसा – १६.१३ टक्के
विहार – ३१.७४ टक्के
तुलसी – ४५.५१ टक्के