मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने सहा महिन्यांपूर्वी ताबा देण्यास सुरुवात केलेल्या नव्या इमारतीतील घरांमध्ये गळती होत असून या प्रकाराची मुंबई मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. एकीकडे इमारतींच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे, तर दुसरीकडे ताबा देण्यात आलेल्या २०७ पैकी ९६ घरांमध्ये अंतर्गत बदल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळेच इमारतींच्या भिंतींना भेगा पडल्या असून त्यातून गळती होत असल्याचे स्पष्ट करीत मंडळाने इमारतींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आयआयटीची नियुक्ती केली आहे. आयआयटीच्या अहवालानंतर गळतीचे नेमके कारण स्पष्ट होईल. पण सध्या मात्र विजेते आणि मुंबई मंडळामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. घरांमधील अंतर्गत बदलामुळे गळती होत असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे, तर इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या आरोपावर विजेते ठाम आहेत.

मुंबई मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये सोडत काढली होती. या सोडतीत विक्रोळीतील अत्यल्प गटातील २५८ घरांचा समावेश होता. या घरांची विक्री किंमत ३६ लाख १६ हजार रुपये होती. साधारण नोव्हेंबर- डिसेंबरपासून विजेत्यांना या घरांचा ताबा देण्यास मुंबई मंडळाने सुरुवात केली. आतापर्यंत २०७ विजेत्यांनी घराचा ताबा घेऊन गृहप्रवेश केला आहे. पहिल्याच पावसात अनेक घरांमध्ये गळती सुरू झाली आहे. नवीन इमारतींमधील घरांत गळती होत असल्याने विजेते हैराण झाले आहेत. याबाबत रहिवाशांनी संबंधित कंत्राटदाराकडे तक्रारही केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. विक्रोळीतील म्हाडाच्या नव्या इमारतींमधील घरात गळती होत असल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई मंडळ खडबडून जागे झाले. इमारतींची तात्काळ योग्य ती दुरुस्ती करण्याचे आदेश मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. या आदेशानुसार दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – मरिन ड्राइव्हवरील पदपथावर वृक्षलागवड अशक्य

मुंबई मंडळाने या इमारतींची दुरुस्ती सुरू केली आहे. त्याचबरोबर या इमारतींची आयआयटी, पवई यांच्यामार्फत तपासणी करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. विजेत्यांनी प्रसाधनगृहात फेरबदल केले आहेत. वातानुकूलित यंत्र बसविण्यासाठी भिंतींना मोठी छिद्र पाडली आहेत. फरश्या बदलल्या आहेत. हे बदल केल्यानेच गळती होत आहे, असे मुंबई मंडळाचे ठाम मत आहे. त्यामुळेच आता घरातील बदलामुळे इमारतींना किती आणि काय नुकसान झाले याची तपासणी आयआयटीकडून करण्यात येणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले.

घरात अंतर्गत बदल केल्याने गळती होत असल्याच्या मुंबई मंडळाच्या आरोपांचे रहिवाशांनी खंडन केले. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे घरामध्ये गळती होत आहे. काही रहिवाशांनी घरात अंतर्गत बदल केले आहेत. मात्र अनेक घरांमध्ये गळती कशी होत आहे, असा सवाल रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, गळतीच्या वृत्तानंतर मुंबई मंडळाच्या संबंधित विभागाने विक्रोळीतील घरांची तपासणी केली असता २०७ पैकी ९६ घरांमध्ये मोठे बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. ३४ घरे बंद असल्याने त्यांची तपासणी करता आली नाही, अशी माहिती मंडळातील अधिकाऱ्याने दिली. ९६ घरांत मोठे अंतर्गत बदल होणे ही बाब मोठी असून चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आल्याने गळती होत असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हेही वाचा – पारपत्र गैरव्यवहार प्रकरण : दलालाच्या घरी व कार्यालयात शोध मोहीम, दीड कोटींच्या रकमेसह कागदपत्र जप्त

घरात बदल करणारे अडचणीत, मंडळाकडून नोटीस

नव्या घरात अंतर्गत बदल करणाऱ्या विजेत्यांचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आता अशा विजेत्याविरोधात कारवाई करणार का, प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असताना रहिवाशांना वेठीस का धरले जात आहे, असा आक्षेप घेत रहिवाशांनी मंडळाच्या नोटिसा पाठविण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.